ऐन हंगामात पावसाचा कहर : भात झडून मोठे नुकसान
वार्ताहर /उचगाव
उचगाव परिसरात मंगळवारी रात्री आठच्या सुमाराला जोरदार पावसाने झोडपल्याने हातातोंडाशी आलेल्या भातपिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
या भागातील उचगाव, सुळगा, कल्लेहोळ, बेकिनकेरे, अतिवाड, गोजगा, तुरमुरी, कोनेवाडी, बसुर्ते, बाची परिसरात भात कापणीचा हंगाम, त्याबरोबरच मळणी हंगामाला जोर आला होता. मात्र, ऐन कापणी, मळणीच्याच हंगामात पावसाने जोर केल्याने भातपिकाचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकरीवर्गातून बोलले जात आहे. अनेक शेतकऱयांनी भातपिके कापून ठेवली आहेत. अनेक शेतकऱयांच्या मळण्या खळय़ावर ठेवण्यात आलेल्या होत्या. सदर मळण्या, भात पावसामध्ये भिजल्याने या संपूर्ण भाताचे अतोनात नुकसान झाल्याने पुढील काळात भात धान्याचे काय करावे, हा प्रश्न शेतकरीवर्गासमोर उभा ठाकला आहे.
गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि ऊन यांचा खेळ सुरू होता. पाऊस येणार नाही, अशी चिन्हे पाहून अनेक शेतकऱयांनी भाताची कापणी आणि मळणी घातली होती. मात्र, मंगळवारी रात्री 8 ते 9 वाजेपर्यंत पावसाने अक्षरशः झोपडून काढल्याने उभी भाताची पिके तसेच कापून ठेवलेली भातपिके झडून फार मोठे नुकसान झाल्याचे शेतकरीवर्गातून सांगण्यात येत आहे. मुसळधार पावसामुळे पुढील चार-पाच दिवस तरी शेतात जाणे मुश्कील असल्याचेही वर्तविले जात आहे. एकंदरीत या अवेळी पावसाने शेतकरीवर्गाचे मोठे नुकसान केले आहे.