प्रतिनिधी/ बेळगाव
जोरदार वादळी वाऱयासह पावसाने बेकिनकेरे गावात अनेक ठिकाणी पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे. गावात अनेक झाडे पडून व पत्रे, कौले आणि वीजवाहिन्या तुटून मोठे नुकसान झाले आहे.
ज्ञानेश्वरनगर येथील मारुती इराप्पा बिर्जे या शेतकऱयाच्या घरावरील पत्रे उडून घरात ठेवलेल्या धान्याचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे हा शेतकरी हतबल झाला आहे. ऐन कोरोनाच्या संकटात मोठा फटका बसला आहे. घरावरील पत्रे उडून पाईपसह घरात ठेवलेल्या भात, जोंधळा व इतर धान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याबरोबर ज्ञानेश्वरनगर येथील नागेंद्र कुंडेकर, मोनाप्पा कुंडेकर यांच्या घरावर झाड कोसळल्याने भिंतीला तडा जाऊन 15 पत्र्यांचे नुकसान झाले आहे. यासह गावातील गवळी गल्ली, लक्ष्मी गल्ली, नागनाथ गल्लीत जागो-जागी झाडे कोसळून अनेकांच्या घरावरील पत्रे, कौले फुटली आहेत. वीजवाहिन्या तुटल्याने बराचवेळ वीजपुरवठा खंडित झाला होता.
लॉकडाऊनमुळे सर्व नागरिक स्वत:ला घरी कोंडून घेऊन आहेत. त्यामुळे हाताला काम नाही. त्यामुळे गोर-गरीब जनतेसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच वादळी वाऱयासह झालेल्या पावसाने अनेकांचे नुकसान झाल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे.