प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात अनेक जुन्या इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. मात्र, पालिकेने 56 इमारतीच्या मालकांना आपली इमारत उतरवून घेण्याच्या नोटीसा बजावल्या गेल्या आहेत. इमारत मालक आणि भाडेकरु यांच्यातील न्यायालयीन वादामुळे या इमारती तशाच धोकादायक अवस्थेत आहेत. आज अशाच जुन्या इमारतीपैकी भवानी पेठेतील कासट यांची इमारत पावसाचे पाणी गेल्याने पडली.
सातारा शहरात गुरुवार पेठ, शनिवार पेठ, बुधवार पेठ, भवानी पेठ, मंगळवार पेठ या भागात जुन्या इमारती धोकादायक अवस्थेत उभ्या आहेत. त्यामुळे या धोकादायक इमारती पावसाळय़ात पडून धोका निर्माण होवू शकतो. शहरात गणेशोत्सवाच्यावेळी विसर्जन मिरवणूकीदरम्यान भिंती अंगावर पडून टोपे मामांसह त्यांच्या दोन मित्रांचा जीव गेल्याचे सातारकरांना सर्वश्रृत आहे. त्याच भागात अजूनही काही इमारती धोकादायक अवस्थेत आहेत. त्याच परिसरातील भवानी पेठेमध्ये कासट यांची जुनी इमारत आज सकाळी आठ ते 9च्या सुमारास पावसाने पडल्याची घटना घडली. सुदैवाने या इमारतीत कोणीही रहात नव्हते. तसेच शहरात अनेक जुन्या इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. त्यातील 56 इमारतींना पालिकेने नोटीसा बजावल्या गेल्या आहेत. इमारतीधारकांना नोटीसा बजावल्या गेल्या असल्या तरीही त्या इमारतीत राहत असलेले भाडेकरु आणि मुळ मालक यांच्यातील न्यायालयीन वादामुळे त्या तशाच आहेत. तसेच काही इमारतींचे मालक तर हयातच नाहीत, अशी अवस्था साताऱयात आहे.