प्रतिनिधी/ बेळगाव
परराज्य आणि परगावाहून शहरात येणाऱया नागरिकांची नोंद करण्यासाठी सीपीएड मैदानावर केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात मंडप उभारण्यात आल्याने गुरूवारी दुपारी व रात्री झालेल्या पावसामुळे मैदानावर पाणीच पाणी झाले. तसेच मंडपात पावसाचे पाणी गळल्याने अडचणीमध्ये अधिकाऱयांना रात्र काढावी लागली.
लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने परराज्य आणि परगावाहून शहरात दाखल होणाऱया नागरिकांची संख्या वाढली आहे. पण परराज्य आणि परगावाहून आलेल्या नागरिकांना सरकारी संस्थेत आणि होम क्वारंटाईन करून नजर ठेवण्याचा आदेश शासनाने दिला आहे. त्यामुळे बेळगावात दाखल होणाऱया नागरिकांची माहिती घेवून त्याची नोंद करणे तसेच आरोग्य तपासणी करून क्वारंटाईन करण्यात येत आहे. याकरिता सीपीएड मैदानावर कोविड-19 केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. पोलीस प्रशासन, आरोग्य आणि महापालिका, तहसिलदार आदी कार्यालयाचे काऊटर सुरू करण्यात आले आहेत. परराज्य आणि राज्याअंतर्गत येणाऱया प्रत्येक नागरिकांची माहिती घेवून त्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. याकरिता खुल्या मैदानावर तात्पुरत्या मंडपाची उभारणी कण्यात आली असून याठिकाणी अधिकाऱयांना बसण्यासाठी आणि संगणक ठेवण्याची सुविधा करण्यात आली आहे.हे कक्ष रात्रंदिवस सुरू ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अधिकारी व मनपाच्या कर्मचाऱयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कोरोनामुळे दोन महिन्यापासून आधिकारी व कर्मचाऱयाचे हाल होत आहेत. अशातच पावसाचा मारा होत असल्याने अडचणीत भर पडली आहे. गुरूवारी दुपारी व रात्री वाऱयासह झालेल्या पावसामुळे मंडपाला गळती लागून कक्षात पाणी साचले होते. तसेच संकणक आणि खुर्च्यावर पाणी पडले होते. तसेच मैदानातदेखील पावसाचे पाणी साचून होते. वळीव पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आधिकारी व कर्मचाऱयांना रात्र घालविण्याची वेळ आली. पावसापासून बचाव होण्याच्यादृष्टीने मंडप उभारणी करून अधिकारी व कर्मचाऱयाची होणारी गैरसोय थांबवावी अशी मागणी होत आहे.