राजकीय उदासिनता, अधिकाऱ्यांचे दुर्लक्षाने रस्ता कागदावर
वारणानगर / प्रतिनिधी
अध्यात्म, निसर्ग, ऐतिहासिक असा त्रिवेणी संगम असलेल्या किल्ले पन्हाळगडावर येण्यास एकच मार्ग आहे. पन्हाळगडावर येण्यास दुसरा पर्यायी रस्ता निर्माण करण्यासाठी राजकीय उदासिनता व आधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कारणीभूत ठरत असल्याने पावसाळा येवून ठेपला तरी पर्यायी रस्ता अजून कागदावरच राहिल्याने नागरिकांत नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
आता पर्यन्त पन्हाळगडावर येणारा रस्ता बुधवार पेठ जवळच अतिवृष्टीने दोन वेळा रस्ता खचला होता. रस्त्याला पडलेल्या भेगा व मोठ्या अतंरापर्यन्त रस्ता खचला अगदी रस्त्याला भगदाड पडले यांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी तातडीने काही कोटी रू. खर्च करून मार्ग पूर्ववत करण्यात आला, तथापी रस्ता खचल्याने पन्हाळगडावरील दळण वळण ठप्प झाले. नागरिकांना शासकीय कार्यालय तसेच न्यायालयीन कामासाठी जाण्यासाठी राक्षी, गुडे मार्गे तीन दरवाजा येथून पायी मोटर सायकलने ये – करावे लागले. अशा वेळी तातडीने पन्हाळगडावर येण्यास पर्यायी मार्ग निर्माण करण्याची चर्चा झाली. कागदोपत्री काम सुरू झाले, तथापी हा मार्ग निर्माण करण्यासाठी शासकीय पातळीवर करावा लागणारा पाठपुरावा करायला कोणच तयार नाही.
पन्हाळा पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे सहा अभियंता एम.आर. पाटील यानी पन्हाळ गडाच्या पर्यायी रस्त्या बाबत कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता (बांधकाम) विभाग यांना सादर केलेल्या अहवालात पन्हाळा तालुक्यातील पन्हाळा पुसाटी पॉईंट ते तुरुकवाडी जवळ इ.जि.मा .१७ ला मिळणारा रस्ता. ग्रामिण मार्ग ५८ रस्ते सुची २००१-२१ मध्ये समाविष्ठ असुन, त्याची एकुण लांबी १ कि.मी.अस्तित्वातील लांबी असुन अपृष्ठांकीत आहे. व रस्त्याची लांबी हि जंगल क्षेत्रातुन जाते, सद्या पायवाट प्रकारचा रस्ता आहे.
पन्हाळा गडावर ये – जा करणेसाठी रा.मा .१९३ हा एकच रस्ता असुन पावसाळ्यामध्ये रस्ता खचणे, दरडी कोसळणे असे प्रकार सतत घडत असतात. पन्हाळा गडावर येण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून ग्रामिण मार्ग क्र.५८ हा उपयुक्त मार्ग होऊ शकतो. सदर रस्ता हा इ.जि.मा.क्र १७ ला मिळणारा रस्ता असुन पन्हाळगड ते शाहुवाडी तालुका हद्द जोडणारा मार्गआहे. पन्हाळागड ते विशाळगड ट्रेकींग मार्ग म्हणुन या रस्त्याचा वापर केला जातो, प्रस्तुत रस्त्याचे काम करणेकामी वन विभागाची पुर्व परवाणगी घेणे आवश्यक आहे. सदर रस्ता करण्यासाठी (साईट क्लिनिंग,कटींग,भरावा करणे, संरक्षक भिंत, मोरी बांधने,खडीकरण,डांबरीकरण ) आदी बाबींचा समावेश करणे आवश्यक आहे .त्यासाठी लागणारा अंदाजित खर्च १०० लक्ष एक कोटी रू.अपेक्षित आहे. असा स्वयंस्पष्ट अहवाल देवूनही याबाबत पुढे कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
पन्हाळा गडास पर्यायी रस्ता जोडणारे मार्ग हे जिल्हा परिषदेच्या कक्षेत आहेत, त्याचे हस्तांतर राज्य शासनाच्या सार्व बांधकाम विभागाकडे तात्काळ होणे व वन विभागाची परवानगी मिळालीतरच हा पन्हाळगडास जोडणारा पर्यायी मार्ग अस्तित्वात येईल.