वृत्तसंस्था / नवी दिल्ली
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होऊन 12 दिवस उलटले आहेत, पण पेगॅसस हेरगिरी प्रकरण आणि शेतकरी आंदोलन यासारख्या अनेक मुद्दय़ांवरून विरोधकांचा गदारोळ सुरूच आहे. या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजावर प्रतिकूल परिणाम झाला आह. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आतापर्यंत 107 तासांपैकी केवळ 18 तासांचे कामकाज होऊ शकले आहे. यामुळे करदात्यांच्या 133 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून सुरू झाले होते. पण आतापर्यंत दोन्ही सभागृहांमधील कामकाजाचा तिढा सुटलेला नाही. पावसाळी अधिवेशनात आतापर्यंत सुमारे 89 तास गोंधळामुळे वाया गेले आहेत. अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. राज्यसभेचे कामकाज निर्धारित वेळेच्या केवळ 21 टक्केच झाले आहे. तर लोकसभेत हे प्रमाण केवळ 13 टक्के राहिले आहे. लोकसभेत 54 तासांपैकी 7 तासांपेक्षाही कमी काळ कामकाज पार पडले आहे.
चर्चेच्या मागणीवर विरोधक ठाम
हेरगिरी प्रकरणी चर्चेसाठी सरकार तयार होत नाही तोवर गदारोळ संपणार नसल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. तर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी विरोधकांची या मुद्दय़ावरील चर्चेची मागणी धुडकावून लावली आहे. पेगॅसस हा मुद्दाच नसल्याचे त्यांनी लोकसभेत बोलताना म्हटले आहे.
पत्रके भिरकावली
पेगॅसस हेरगिरी प्रकरणावर चर्चेच्या मागणीवरून विरोधी पक्षांच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या दिशेने 28 जुलै रोजी पत्रके भिरकावली होती. यादरम्यान खासदारांनी खेला होबे अशा घोषणाही दिल्या होत्या. त्या दिवशी कामकाज अनेकदा स्थगित करावे लागले होते. या घटनेमुळे नाराज लोकसभा अध्यक्षांनी 10 खासदारांना निलंबित करण्याचा इशारा दिला होता. यात खासदार गुरजीत सिंग औजला, टी.एन. प्रथापन, मणिकम टागोर, रवनीत सिंग बिट्टू, हिबी ईडेन, जोतिमणी सेन्नमलई, सप्तगिरि शंकर उलका, व्ही. वैथिलिंगम आणि ए.एम. आरिफ यांचा समावेश होता.
विरोधी पक्षांची बैठक
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी समान विचारसरणी असलेल्या 14 विरोधी पक्षांची 28 जुलै रोजी बैठक बोलाविली होती. या बैठकीत सरकारची कोंडी करण्याची योजना आखण्यात आली होती. पेगॅसस हेरगिरी प्रकरण, महागाई आणि शेतकऱयांच्या मुद्दय़ावर कुठलीच तडजोड करणार नसल्याचे राहुल यांनी बैठकीनंतर म्हटले होते. या बैठकीत काँग्रेस, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस, राजद, सप, भाकप, नॅशनल कॉन्फरन्स, आप, इंडियन युनियन मुस्लीम लीग, राष्ट्रीय समाज पक्ष, केरळ काँग्रेस (एम), विदुथालाई चिरुथैगल कच्ची आणि एसएस पक्षाचे नेते सामील झाले होते.