बेळगाव / प्रतिनिधी
अलीकडच्या काही वर्षात पावसाळी प्लास्टिक चप्पल व बुटांना मागणी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. वापरण्यास हलके, टिकावू कमी किमतीत उपलब्ध होणाऱया चप्पल व बूट खरेदीकडे ग्राहकांचा ओढा वाढला आहे. सध्या बाजारात वेगवेगळय़ा आकार व रंगांमध्ये उपलब्ध असलेल्या पावसाळी चप्पल व बुटांकडे ग्राहक आकर्षिले जात आहेत. मात्र, आज-कालच्या या सगळय़ा रंगीबेरंगी बुटांमधून पूर्वी पावसाळय़ामध्ये खासकरून वापरले जाणारे गमबूट गायब झाले आहेत. हमखास पावसाळय़ात वापरण्यात येणारे गमबूट गेले कुठे, असा प्रश्न अनेकांना पडत आहे.
सध्या मान्सूनला सुरुवात झाली असून, पावसाळी साहित्यांनी बाजारपेठ बहरलेली आहे. बाजारात रेनकोट व छत्र्यांबरोबर पावसाळी चप्पल व बुटांना मागणी वाढली आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे गतवषीच्या तुलनेत यंदा काही प्रमाणात खरेदी थंडावली असल्याचे विपेते सांगत आहेत. पावसाळय़ाला सुरुवात झाली की, पूर्वी बाजारपेठेतील दुकानांतून गमबूट पाहायला मिळायचे. मात्र आता ते दुकानांतूनच गायब झाल्याचे दिसत आहे.
साधारण 25 ते 30 वर्षांपूर्वी शेतकऱयांसह शालेय विद्यार्थी, नोकरदार आणि पावसाळय़ात घराबाहेर पडणाऱया प्रत्येक पुरुषाच्या पायात गमबूट दिसत होते. काळानुसार हे गमबूट आता दुर्मीळ झाले आहेत. आता प्रत्येकाच्या पायात रंगीबेरंगी चप्पल व बूट पाहायला मिळतात. सध्या बाजारात विविध आकार व रंगांमध्ये असलेले फॅशनेबल चप्पल व बूट ग्राहकांना भुरळ घालत आहेत. पूर्वी प्रत्येकाच्या पायात दिसणाऱया गमबुटची जागा आता प्लास्टिक, रबरी चप्पल व बुटांनी घेतली आहे. सध्या बाजारात पावसाळी चपलांचा दर 150 पासून 350 रुपयांपर्यंत आहे. बुटांचा दर 250 ते 350 रुपयांपर्यंत आहे.
पूर्वी पायांच्या संरक्षणासाठी गमबुटाशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे गमबुटांचा वापर सर्रास होत होता. मात्र, आता गमबूट दुर्मीळ झाले असून सध्या सर्वजण फॅशन म्हणून विविध प्रकारचे चप्पल व बूट वापरताना दिसतात. सध्या शहरासह ग्रामीण भागातील गल्लो-गल्लीतील रस्ते काँक्रिटीकरण व डांबरीकरण झाले आहेत. त्यामुळे चिखल नसल्याने गमबुटांची मागणी कमी झालेली दिसून येत आहे. आज केवळ पायांच्या सुरक्षिततेसाठी म्हणून अवजड उद्योग, बांधकाम व्यवसाय, खाणीत, फौंडीमध्ये, अग्निशमन दल, हेस्कॉमचे कर्मचारी गमबूट वापरताना दिसतात.