वार्ताहर/ साखरपा
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबा घाटात मोठय़ा प्रमाणात दरडी कोसळल्याने सुमारे 15 दिवस घाट पूर्णपणे बंद होता. दुरुस्तीनंतर केवळ लहान चार चाकी गाडय़ांसाठी हा मार्ग सुरू करण्यात आला. मात्र अवजड वाहनांना घाट खुला होण्यासाठी अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांनी दिली.
खचलेल्या रस्त्याचे परीक्षण करण्यात आले असून त्या ठिकाणी डोंगर आणखी खोदून अथवा संरक्षक भिंत बांधून अवजड वाहनांची वाहतूक सुरू होऊ शकते. मात्र पावसाळा पूर्ण झाल्याशिवाय या कामाला प्रारंभ करणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. हा मार्ग अवजड वाहनासाठी बंद असल्याने सध्या अणुस्कुरा, कुंभार्ली, फोंडा आदी मार्गांचा वापर होत आहे. यामुळे माल व प्रवासी वाहतुकीचा खर्च वाढत आहे. त्यामुळे ही वाहतूक पुन्हा लवकर पूर्ववत व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.