वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
यावर्षीचा पावसाळा संपल्यानंतरच क्रिकेट खेळता येणे शक्य होणार असल्याचे प्रतिपादन बीसीसीआयचे प्रमुख कार्यकारी राहुल जोहरी यांनी केले आहे. यावर्षी आयपीएल होण्याबाबत मात्र त्यांनी आशावाद व्यक्त केला आहे.
खेळाडूंची सुरक्षितता आमच्यासाठी महत्त्वाची असल्याचा पुनरुच्चार करीत ते म्हणाले की, या महामारीच्या स्थितीत योग्य तो निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकावर सोपवावा. प्रत्येकाला आपल्या सुरक्षिततेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असून त्याचा आम्ही आदर करायला हवा. क्रिकेट सुरू करण्याबाबत केंद्र सरकारच्या दिशानिर्देशानुसारच आम्ही निर्णय घेणार आहोत. तसेच कोरोनाचा प्रभाव इतक्यात कमी होण्याची शक्यता नसल्याने पावसाळय़ानंतरच क्रिकेट प्रत्यक्ष मैदानात खेळता येईल,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
जून ते सप्टेंबरपर्यंत भारतात पावसाळा असतो आणि जर टी-20 विश्वचषक स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला गेला तर त्याच कालावधीत आयपीएल स्पर्धा घेतली जाण्याची जास्त शक्यता आहे, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.