अध्याय आठवा
आशानिराशेच्या खेळामुळे उपरती झालेल्या वारांगनेला अवधुतानी गुरु केले. उपरती झाल्यावर तिच्या लक्षात आले की, ज्याच्या बुद्धीत वैराग्य नाही, त्याला जन्ममरणाची आधिव्याधी पावलोपावली बाधक होते. त्याला मोह ममतेने आवळलेली देहबुद्धीची बेडी घातलेली असते. तो रात्रंदिवस विषयाचे दळण दळीत असतो.
त्याला तेथून बाहेर निघण्याचीच इच्छा होत नाही. परिणामी लोभरूपी विंचू नांगी मारतो. त्याचा फणकारा अनिवार चढतो मग आतून बाहेरून निंदारूप कळा मारू लागतात. द्रव्यनाशाची आग व द्वेषाची फुणफुण सुरू होते. मनुष्य अभिमानाचे आळोखेपिळोखे देऊ लागतो व मोहाचे उमासे जोराने येऊ लागतात. तरीही हा विषयाचे दळण जोराने दळीत गृहरूपी शेजेवर दुःखाने लोळत असतो. पुढे तिला वाटू लागले की, इंद्रियांच्या अधीन झालेल्या माझा मूर्खपणा आणि मोहाची झेप तर पहा! क्षुद्र माणसांकडून विषयसुखाची इच्छा करीत होते. माझ्या मनाला काही धरबंधच नव्हता. लटकाच मायेचा विस्तार मी वाढवला होता. माझ्या मूर्खपणाचा अंतपार पहावयाला गेले असता विचारच कुंठीत होतो. स्त्रीला जर पुरुष पाहिजे तर अंतरातला सत्पुरुष टाकावयाचा आणि निरंतर नीच पुरुषाशी रत व्हावयाचे, हाच माझा मूर्खपणा! नीच पुरुषाशी रममाण होऊन आनंद मानण्यात मी भ्रमाचा कळस करून सोडला. माझा खरा पती नेहमी माझ्याजवळच आहे तोच मला परमानंद आणि परमार्थधन देणारा आहे. त्याला सोडून मी माझी एकही इच्छा पूर्ण करू शकत नाही. उलट जे मला दुःख, भय, आधिव्याधी, शोक आणि मोह देणारे आहेत, अशा क्षुद्र माणसांचे मी सेवन करीत राहिले. किती मी मूर्ख! शाश्वत पुरुषाचा लाभ अगदी जवळ असताना, विषयासक्तीमुळे तो मला कळला नाही. त्याच्याशी रत झाले असता तत्काळ कामनिवृत्ति होते. कामाची निवृत्ति करून तो अपार शाश्वत सुख जोडून देतो. तोच वित्तदाताही होय. त्याचे देणे अलौकिक असते! तोच मला परमानंद आणि परमार्थधन देणारा आहे. त्याला सोडून मला दुःख, भय, आधिव्याधी, शोक आणि मोह देणाऱया क्षुद्र माणसांचे मी सेवन करीत राहिले. खरा पती निजात्मपदासह संपूर्ण ऐश्वर्य बहाल करतो आणि पुरुष व स्त्रिया या दोघांनाही तो रमवणे जाणतो! तोच एक सर्वांचा रमण म्हणजे पती होय. असा कांत टाकून मी केवढी मूर्ख पहा, की निरंतर कामप्राप्तीसाठी ज्याच्यापासून काम पूर्ण व्हावयाचा नाही अशा पुरुषास भजत होते! अरेरे! मी अत्यंत निंद्य अशा वेश्यावृत्तीचा आश्रय करून माझ्या शरीराला आणि मनाला व्यर्थच क्लेश दिले. जसे बांबूचे आढे, वासे, पट्ìîाा इत्यादींनी घर बांधावे, त्याप्रमाणे पाठीचा कणा, हाडे इत्यादींनी हे शरीररूपी घर तयार झाले आहे. ते त्वचा, लव तसेच नखांनी आच्छादिले आहे. याच्या नऊ दरवाजांमधून सदैव मलमूत्र इत्यादी वाहत असते. माझ्याखेरीज दुसरी अशी कोणती स्त्री असेल की, जी या निंद्य शरीरालाच प्रिय समजून त्याचे सेवन करील? जो अगदी निकटवर्ती हृदयस्थ, पुरुषांमध्ये पुरुषोत्तम त्याच्यामुळे मिळणाऱया सुखाला काही केल्या कमी नाही.
अशा हृदयस्थाला, नारायणाला विसरले आणि ज्यांच्या हातून कामप्राप्ती व्हावयाची नाही अशा इतर पुरुषांवर मात्र मी भाळले! सर्व प्राण्यांचे आत्मा, त्यांचे हित करणारे, माझे प्रियतम स्वामी आहेत. आता मी स्वतःचीच किंमत देऊन यांना विकत घेईन आणि लक्ष्मीप्रमाणे यांच्याबरोबर विहार करीन. जो माझ्या हृदयातला आप्त, प्रियकर अच्युत तोच सर्वत्र भरून राहिलेला माझा अंतरात्मा होय. तोच माझा स्वामी व तोच माझा पति होय. त्यालाच मी साटेलोटे करून ताबडतोब विकत घेईन आणि त्यालाच परमानंदाने मिठी मारीन, धन्य माझे भाग्य की याच रात्री याच क्षणी मला विवेक व वैराग्य यांची प्राप्ती झाली. माझ्यावर लक्ष्मीपति संतुष्ट झाला! या जन्मातले माझे कर्म पाहिले तर ते केवळ निंद्य स्वरूपाचे आहे. पूर्वजन्मीचा काही ठेवा होता, म्हणूनच मजवर पुरुषोत्तम प्रसन्न झाला. पिंगलेचे मनोगत नाथांनी खूप सविस्तर व्यक्त केले असून उद्बोधक आहे.