प्रतिनिधी / आटपाडी
पावसाची चुकीची नोंद करून पिकविम्याचा अडसर बनलेल्या स्कायमेटच्या नोंदींचा विषय राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यापुढे मांडण्यात आला. महसुल व स्कायमेटच्या पावसाच्या नोंदीत प्रचंड तफावत असुन शेतकऱयांना विमा मिळणार नाही, अशी तरतुद झाल्याचा प्रश्न पाणी संघर्ष चळवळीचे आनंदराव पाटील यांनी जलसंपदा मंत्र्यांपुढे मांडला. याबाबत माहिती घेवुन मंत्रीमंडळाच्या बैठकीत धोरण बदलण्यासाठी कार्यवाही करण्याची ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
आटपाडी तालुक्यातील सप्टेंबर व ऑक्टोंबर 2019 या कालावधीतील पावसाच्या नोंदीमध्ये तफावत निर्माण झाली आहे. त्यातुन शेतकऱयांना पिकविमा मिळणार नाही, अशी दक्षता स्कायमेटने घेतली आहे. याबाबतचा प्रश्न आनंदराव पाटील यांनी रविवारी सांगलीमध्ये राज्याचे नुतन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यापुढे मांडला. फळपिक विम्याचा लाभ शेतकऱयांना मिळण्याचा अडसर निर्माण करून स्कायमेटने अन्याय केला आहे. महसुल प्रशासन व स्कायमेटच्या पावसाच्या नोंदींमध्ये तफावत असुन स्कायमेटने चुकीची आकडेवारी देवुन फसवणुक केली आहे.
शेतकऱयांना नुकसान होवुनही विमा मिळणार नाही, याची दक्षता घेण्यात आली असुन स्कायमेट व विमा कंपनीच्या धोरणामुळे शेतकरी नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे आनंदराव पाटील यांनी सांगितले. आटपाडी तालुक्यातील शेतकऱयांवरील हा अन्याय दुर करण्याची मागणी करत आनंदराव पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यापुढे महसुल विभाग व स्कायमेटच्या नोंदीतील पावसाची तफावत, कृषि अधिकाऱयांनी वरिष्ठांकडे केलेला पाठपुरावा याची माहिती व कागदपत्रे सादर केली.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एकदा विमा भरल्यानंतर संबंधित शेतकऱयांना त्याचा वर्षभर लाभ मिळण्याबाबत आपण पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. तसेच मंत्रीमंडळाच्या बैठकीत पिकविमा, स्कायमेटच्या नोंदीतील तफावत याबाबत चर्चा करून त्याबाबतचे धोरण बदलण्यासाठी कार्यवाही करण्याची ग्वाहीही मंत्री जयंत पाटील यांनी दिली. तसेच जिल्हाधिकाऱयांना याबाबत अहवाल देण्याचे निर्देशही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्याचे आनंदराव पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी वसंतराव पाटील, उमाजी सरगर, शंकर गळवे, रवि लांडगे, भानुदास खांडेकर यांच्यासह आटपाडी तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.