प्रतिनिधी/ केळघर
गेल्या पंधरा दिवसापासून परिसरात पडत असलेल्या संततधार पावसामुळे बटाटा, भुईमूग,सोयाबीन यासह कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला असून पावसाने नुकसान झाले आहे हे संकट कमी म्हणून की काय कळपाने फिरणाया वानरे व रानडुक्करे हातातोंडाशी आलेली पिके फस्त करत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.जून व जुलै महिन्यात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली होती. पाऊस नसल्यामुळे या वेळी पाणी विकत घेऊन शेतकयांना भात लागण उरकावी लागली होती. मात्र उसंत घेतलेल्या पावसाने ऑगस्ट महिन्यात जोरदार कमबॅक केल्याने शेतकरी सुखावले होते. मात्र सतत पाऊस पडत असल्याने घेवडा, बटाटा, भुईमूग, सोयाबीन ही पिके तसेच कडधान्य पिकेही शेतात पाणी साचून राहिल्याने अक्षरशः कुजली आहेत. पावसाचा फटका भात शेतीलाही बसणार असून त्यामुळे उत्पन्नात घट येण्याची भीती ही शेतकरी व्यक्त करत आहेत.
संततधार पावसाने शेतकऱयांचे नुकसान होत असताना उभ्या पिकांना रानडुकरे व वानर लक्ष्य करत असल्याचे शेतकयांनी सांगितले. शेतातील उभी पिके कळपाने फिरणारे वानरे, रानडुकरे फस्त करत आहेत. हातातोंडाशी आलेली पिके मातीमोल होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पावसामुळे स्ट्राबेरी पिकाचे नुकसान झाले आहे. यंदा कोरोनामुळे स्ट्राबेरी पिकाची रोपही पुरेशा प्रमाणात शेतकयांना उपलब्ध झाली होती. गेल्या वर्षी ही स्ट्राबेरी उत्पादक शेतकयांना पावसामुळे नुकसान सहन करावे लागले होते. यंदा ही तिचं पुनरावृत्ती असून जास्त पावसाचे पाणी रोपांच्या स्रयामध्ये साठून राहिल्याने या ही पिकाचे नुकसान झाले आहे. एकूणच भातासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकयांच्या शेती उत्पन्नात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. संततधार पावसामुळे भातासह कडधान्य पिके, बटाटा, घेवडा या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱयांचे कंबरडे मोडले असून संबंधित विभागाने नुकसानीत क्षेत्राचा तातडीने पाहणी व पंचनामा करावा अशी मागणी केळघर सोसायटीचे अध्यक्ष बबनराव बेलोशे, संचालक राघव बिरामने यांच्यासह शेतकयांनी केली आहे.