वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कृषी क्षेत्रात ‘पिकानंतरच्या क्रांती’च आवश्यकता असल्याचे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी काढले आहेत. मेहनती शेतकऱयांनी कोविड-19 महामारीच्या अभूतपूर्व आव्हानांदरम्यानही विक्रमी पीक घेतले आहे. वाढत्या कृषी उत्पादनासोबत पिकानंतरची क्रांती आणि मूल्यवर्धनाची आवश्यकता असल्याचे मोदींनी नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटच्या स्थापनादिनी बोलताना म्हटले आहे.
पिकानंतरची क्रांती गाठण्यासाठी आम्ही वेगाने प्रयत्न करत आहोत. सिंचनापासून, पेरणी, कापणी आणि कमाईपर्यंत पूर्ण तोडगा प्राप्त करण्यासाठी व्यापक पावले उचलत आहोत असे मोदी म्हणाले.
केंद्र सरकारने मागील वर्षी तीन नवे कृषी कायदे संमत केले आहेत. पण शेतकऱयांच्या विरोधादरम्यान या कायद्यांची अंमलबजावणी रोखण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने देखील पुढील आदेशापर्यंत तिन्ही कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली होती. तसेच तोडगा काढण्यासाठी चार सदस्यीय समिती नियुक्त केली होती.
युवांना प्रोत्साहन देण्याचा आणि कृषी क्षेत्राशी संबंधित स्टार्टअप्सना चालना देण्यावर सरकारचा भर आहे. आम्ही एका वैज्ञानिक पद्धतीने स्थितीनुरुप व्यवस्था तयार करणे, गावांच्या इच्छा आणि अपेक्षेनुसार विकासला वेग देणे आणि समग्र दृष्टीकोनाच्या माध्यमातून कृषी क्षेत्राची अर्थव्यवस्था बदलण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
आत्मनिर्भर भारतासाठी आत्मनिर्भर ग्रामीण अर्थव्यवस्था आवश्यक आहे. सरकारने मागील 7 वर्षांमध्ये याकरता ठोस उपाययोजना केल्या आहेत. सरकार सुमारे 12 कोटी अल्पभूधारक शेतकऱयांना सशक्त करणे आणि त्यांना ग्रामीण अर्थव्यवस्थेचे प्रेरक शक्ती होण्यास मदत करण्यासाठी प्रतिबद्ध राहिल्याचे मोदी म्हणाले.