-जिल्हा प्रशासनाकडे महापूरबाधित पिक नुकसान भरपाईसाठी निधी प्राप्त
कृष्णात चौगले /कोल्हापूर
जुलैअखेरीस झालेली अतिवृष्टी आणि महापूरामुळे जिह्यातील 73 हजार 923 .88 हेक्टर क्षेत्रातील शेतपिकांचे नुकसान झाले. सदरची पिक नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाकडून 85 कोटी 70 लाख रूपयांचा निधी पुणे विभागीय आयुक्तांकडे प्राप्त झाला असून तेथून लवकरच जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केला जाणार आहे. पण राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार वितरीत केली जाणारी ही नुकसान भरपाई अतिशय तुटपुंजी आहे. बागायती पिकासाठी प्रति हेक्टरी केवळ 13 हजार 500 रूपये, फळबाग पिकांसाठी हेक्टरी 18 हजार, तर जिरायती पिकांसाठी हेक्टरी 6 हजार 800 रूपये नुकसान भरपाई दिली जाणार आहे. मातीमोल झालेल्या पिकांच्या तुलनेत ही भरपाई अतिशय तुटपुंजी आहे.
अतिवृष्टी व महापूरामुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासनाने नुकताच अद्यादेश काढला असून राज्यातील अतिवृष्टीबाधित 22 जिह्यांसाठी 365 कोटी 67 लाखांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी संबंधित विभागीय आयुक्तांमार्फत लवकरच सर्व जिह्यात वितरीत केला जाणार आहे. शासन निर्णयानुसार संपूण रक्कम बीम्स प्रणालीवर वितरीत करण्यात येणार आहे. त्यामुळे नुकसान भरपाईची रक्कम ऑनलाईन पद्धतीने थेट बाधित शेतकऱयांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या शासनाने सूचना दिल्या आहेत.
उत्पादन खर्चाइतकीही नाही नुकसान भरपाई
शासनाकडून मंजूर निधीतून बागायती पिकांसाठी हेक्टरी 13 हजार 500 म्हणजेच प्रतिगुंठा 135 रूपये, जिरायती पिकांसाठी प्रतिगुंठा 68 रूपये तर फळबागांसाठी प्रतिगुंठा 180 रूपये नुकसान भरपाई दिली जाणार असून शेतकऱयांची घोर निराशा झाली आहे. ही भरपाई 2019 च्या महापूरबाधितांना दिलेल्या नुकसान भरपाईच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. तेंव्हा केवळ कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिह्यातील काही भाग महापूरबाधित झाला होता. त्यामुळे कर्जदार शेतकऱयांना प्रतिगुंठा 950 तर बिगर कर्जदार शेतकऱयांना प्रतिगुंठा 405 रूपये नुकसान भरपाई दिली होती. पण यंदाच्या पावसाळ्यात तब्बल 22 जिह्यात मोठे नुकसान झाले झाले आहे. तसेच कोरोना महामारीमुळे राज्यसरकार अर्थिक संकटात असल्यामुळे भरपाई कमी दिली असल्याचे शासनाचे म्हणणे आहे. पण यावर्षी मोठे नुकसान झाले असताना शासनाकडून किमान उत्पादन खर्च निघेल इतकी नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित होते.
विभागनिहाय नुकसान भरपाई
अतिवृष्टी नुकसान भरपाईपोटी शासनाकडून कोकण विभागातील पाच जिह्यांसाठी 8 कोटी 51 लाख, नाशिकसाठी 1 लाख, पुणे विभागातील चार जिह्यांसाठी सर्वाधिक 150 कोटी 12 लाख, अमरावती विभागातील पाच जिह्यांसाठी 118 कोटी 41 लाख, औरंगाबादच्या चार जिह्यांसाठी 77 कोटी 97 लाख, नागपूरमधील 3 जिह्यांसाठी 100 कोटी 65 लाख रूपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
नुकसान भरपाईचा निधी प्राप्त होताच त्वरीत वितरण
राज्यशासनाच्या अद्यादेशानुसार जुलैमध्ये आलेल्या महापूरबाधित शेतपिकांच्या नुकसान भरपाईपोटी लवकरच शासनाकडून निधी प्राप्त होईल. त्यानुसार प्राप्त निधीतून बाधित शेतकऱयांना त्वरीत भरपाई दिली जाणार आहे. -राहूल रेखावार, जिल्हाधिकारी
पिक कर्ज पुनर्गठनाचा निर्णय पण अंमलबजावणी कधी ?
कोल्हापूर जिह्यातील अतिवृष्टी व महापुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱयांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचा जिल्हा बँकेने निर्णय घेतला आहे. सरकारी पंचनाम्यानुसार 30 ते 50 टक्क्यांच्या दरम्यान पिकांचे नुकसान झालेल्या कर्जदार शेतकऱयांना अल्पमुदत कर्ज व त्यावरील व्याजाचे दोन वर्षांसाठी पुनर्गठन केले जाणार आहे. त्यासाठी एक वर्ष सवलतीचा कालावधी असून शेतकऱयांच्या मागणीनुसार बाधित क्षेत्रासाठी नवीन पीक कर्ज उपलब्ध करण्याचाही जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाचा निर्णय झाला होता. पण सध्या विकास सेवा संस्थांनी 30 सप्टेबर 2021 अखेरची वसूलपात्र रक्कम निश्चित केली आहे. 15 ऑक्टोबरनंतर साखर कारखाने सुरु झाल्यानंतर विकास संस्थांकडून पिक कर्ज वसूल केले जाणार आहे. त्यामुळे जिल्हा बँकेकडून पिक कर्ज पुनर्गठनाबाबत निर्णय झाला असला तरी त्याबाबत त्वरीत परिपत्रक काढण्याची गरज आहे.