गृहमंत्री बोम्माई यांची माहिती : उन्हाळय़ात समस्या उद्भवणार नसल्याचे विधानसभेत स्पष्टीकरण
प्रतिनिधी / बेंगळूर
उन्हाळा कालावधीत पिण्याचे पाणी आणि शेतकऱयांच्या कृषी पंपसेटना सुरळीत वीजपुरवठा करण्यात कोणत्याही समस्या निर्माण झालेल्या नाहीत, अशी माहिती गृहमंत्री तथा कायदा आणि संसदीय कामकाजमंत्री बसवराज बोम्माई यांनी विधानसभेत दिली. मंगळवारी प्रश्नोत्तर चर्चेवेळी काँग्रेसचे आमदार के. वाय. नंजेगौडा यांनी विचारलेल्या प्रश्नावर बोम्माईंनी मुख्यमंत्र्यांच्या वतीने उत्तर दिले.
पिण्याचा पाणीपुरवठा होणाऱया केंद्रांना 24 तास थ्रीफेज विद्युत पुरवठा केला जात आहे. तसेच शेतकऱयांच्या कृषी पंपसेटच्या फिडरना देखील सध्या जारी असणाऱया आदेशाप्रमाणे 7 तास वीजपुरवठा केला जात आहे. तांत्रिक समस्या असणाऱया भागात कृषी पंपसेटच्या फिडरना दिवसा सलग 7 तास थ्रीफेज वीजपुरवठा केला जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
कोणतेही विद्युत ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाल्यास नियमाप्रमाणे शहरी भागात 24 तासांत आणि ग्रामीण भागात शेतीसाठी वीजपुरवठा होणारे ट्रान्सफार्मर 72 तासांत बदलण्यात येते. या बाबतीत समस्या असतील तर त्या सोडविण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात येतील. ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाल्यास ते बदलण्यासाठी अनुकूल व्हावे यासाठी ट्रान्सफार्मर बँक स्थापन करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यात ट्रान्सफार्मर दुरुस्ती केंद्रे सुरू केली आहेत, अशी माहिती बसवराज बोम्माई यांनी दिली.
उत्तरावर आमदार समाधानी
मात्र, बोम्माईंच्या उत्तरावर समाधान न झाल्याने सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या अनेक आमदारांनी आक्षेप घेतला. 24 तास नव्हे; तर 24 दिवस उलटले तरीही ट्रान्सफार्मर बदलण्याचे काम होत नाही. 24 तासांत ट्रान्सफार्मर बदलल्याचे उदाहरण कोठेही नाही, अशी नाराजी व्यक्त केली. या मुद्दय़ावर अनेक आमदार बोलण्यासाठी सरसावल्याने विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी ही ज्वलंत समस्या आहे. याविषयी वेगळय़ा पद्धतीने चर्चा करण्याची मुभा देण्यात येईल, असे सांगितले.
पाणीपुरवठा समस्या दूर करण्यासाठी अनुदान
उन्हाळय़ात निर्माण होणारी पाणीपुरवठय़ाची समस्या दूर करून समर्पकपणे पाणीपुरवठा करण्यासाठी सरकार आवश्यक अनुदान देईल, अशी माहिती ग्रामविकास-पंचायतराज मंत्री ईश्वरप्पा यांनी दिली. मंगळवारी विधानसभेत शून्य प्रहर वेळेत निजद आमदार ए. टी. रामस्वामी यांनी विचारलेल्या प्रश्नावर ईश्वरप्पांनी उत्तर दिले. मागील तीन वर्षांपासून दुष्काळी भागांना पिण्याचा पाणीपुरवठा करण्यासाठी 50 लाख रुपये देण्यात आले आहेत. उन्हाळा कालावधीतील संभाव्य पाणीटंचाई दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याचे ते म्हणाले.