पूर नियंत्रणासाठी जिल्हा यंत्रणा सज्ज
वार्ताहर/ कराड
पावसाळयाच्या काळात उद्भवणाऱया पूर परिस्थितीशी सामना करण्यासाठी जिल्हय़ाची यंत्रणा सज्ज असून यावर्षी असलेल्या कोरोना संकटाचा विचार करून पूरपरिस्थिती हाताळण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी नदीकाठच्या जनतेला पुराच्या धोक्याची पुर्वसूचना देण्यासाठी पिनकोड निहाय बल्क मेसेज यंत्रणेचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सुचनेनुसार कराड तालुक्यात पावसाळय़ाच्या काळात उद्भवणाऱया पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्वतयारीची बैठक बुधवारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनमध्ये पार पडली. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, नगरसेवक, नदीकाठच्या गावचे सर्व सरपंच, पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी, ग्रामसेवक व कर्मचारी या बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱयांनी पूरपरिस्थिती संदर्भात केलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते यांची उपस्थिती होती.
गेल्या वर्षी 100 वर्षातील सर्वाधिक पाऊस झाल्याने कराडला भयानक पूरपरिस्थिती निर्माण झाली. मात्र प्रशासकीय यंत्रणांनी राबवलेल्या उपाययोजनांमुळे अतिशय चांगल्या प्रकारे पूरपरिस्थिती हाताळण्यात आली. या सर्व बाबींचा अभ्यास करून यावर्षी अधिक चांगल्या प्रकारे पूरपरिस्थितीशी लढण्याची तयारी करण्यात आली आहे. ज्या त्या भागातील व गावांतील पुराच्या धोक्यासंदर्भात सूचना द्यावयाच्या आहेत, त्यासाठी पिनकोड निहाय बल्क मेसेज यंत्रण यावर्षी राबवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.
कराड तहसिल कार्यालयाकडे पूर्वीच्या दोन बेटी आहेत. तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने नुकत्याच आणखी दोन बेटी कराडला दिल्या आहेत. याबाबत नदीकाठच्या गावांतील स्वयंसेवक, अधिकारी व कर्मचाऱयांना बोट चालवण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. याशिवाय पंचायत समितीकडे दोन नादुरूस्त फायबर बोटी आहेत. येत्या आठ दिवसांत या दोन्ही बोटी दुरूस्त करून कराडला देणार आहेत. तसेच ऐनवेळी गरज पडलीच तर आणखी बोटी उपलब्ध करण्याची सोय केली असल्याची माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली.
पूरपरिस्थितीत स्थलांतरीत करण्यात येणाऱया कुटुंबांचा अभ्यास करण्यात आला आहे. यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल, अशा पद्धतीने पूरग्रस्तांचे तात्पुरते पुर्नवसन करण्यात येणार आहे. त्याचे जेवण, शौचालय आदी प्रकारची सर्व सोय करण्यात आली आहे. याबाबत पुररेषेतील लोकांना पूर्वकल्पना देण्यात येत आहे. म्हणजे पूर आल्यानंतर त्या लोकांना आपली जनावरे व साहित्य घेऊन कुठे जायचे आहे, याची पूर्वकल्पना असणार आहे.
महामार्गावर अडकणाऱया ट्रकचालकांची विशेष सोय
महामार्गावर पाणी आल्याने महामार्गावर शेकडो ट्रकचालक व वाहनचालक अडकून पडतात. गेल्या वर्षी या लोकांची प्रशासन व स्वयंसेवी संस्थांनी जेवणाची व्यवस्था केली होती. यावर्षी महामार्गावर अडकणाऱया ट्रकचालक व अन्य वाहनचालकांची जेवणाची सोय व येणाऱया अन्य अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना आखली आहे.
पावसाळयानंतर पूररेषेतील लोकांच्या पुर्नवसनाच्या प्रश्नला प्राधान्य
कराडसह संपूर्ण राज्यात पूररेषेतील लोकांच्या पुर्नवसनाचा प्रश्न आहे. कराडबाबत आपत्कालिन बैठकीत चर्चा झाली. पूर रेषेतील लोकांच्या पुर्नवसनाचा प्रश्न पावसाळापूर्व सोडवणे शक्य नाही. मात्र पावसाळयानंतर कराडच्या पूर रेषेतील लोकांचे पुर्नवसन करण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.