टिप्पर-डंपर चालकांच्या भरधाव वाहनांचा नागरिकांना त्रास : अपघातांच्या वाढत्या घटना
वार्ताहर /किणये
बेळगाव-चोर्ला रस्त्यावर सुसाट धावणाऱया वाहनांमुळे स्थानिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे. यामुळे पिरनवाडी-किणये रस्ता धोकादायक बनला आहे.
बेळगाव-चोर्ला रोडवरील पिरनवाडी ते किणयेपर्यंतच्या रस्त्यावरून टिप्पर, डंपर यांची मोठी वर्दळ असते. ही वाहने सुसाट धावतात. यामुळे परिसरातील नागरिकांना जीव मुठीत घेऊनच या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. उचवडे परिसरात 6 खडी मशीन्स आहेत. या खडी मशीनमधून चिपिंग, खडी व बोर्डर घेऊन टिप्पर व डंपर चालक वाहतूक करीत असतात. या टिप्पर, डंपर चालकांच्या वेगावर नियंत्रण कधीही नसते. नेहमीच सुसाट धावत असतात. गेल्या पाच-सहा वर्षापासून किणये रस्त्यावर अनेक अपघातांच्या घटना घडलेल्या आहेत. या खडी मशीन मालकांना वारंवार सांगूनही दुर्लक्ष केले जात असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया किणये भागातील नागरिकांतून उमटू लागल्या आहेत. गेल्या पाच-सहा वर्षात या रस्त्यावर सर्वाधिक अपघात हे टिप्पर व डंपर यांच्यामुळे झालेले
आहेत.
वेगावर नियंत्रण ठेवा, अन्यथा रास्ता रोकोचा इशारा
रस्त्याच्या बाजूला गावे, विविध प्रकारची कार्यालये, शाळा, दुकाने आहेत. त्यामुळे परिसरातील लोकांची वर्दळ या ठिकाणी असते. किणये, बहाद्दरवाडी आदी परिसरातील शेतकऱयांच्या जमिनीही या रस्त्याच्या बाजूला आहेत. त्यामुळे शेतकरी तसेच जनावरेही या रस्त्यावरून ये-जा करीत असतात. या टिप्पर, डंपर चालकांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी, अन्यथा किणये येथे रास्ता रोको करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
भरधाव वाहनांमुळे नागरिकांना त्रास
पिरनवाडी-किणये या रस्त्यावर गेल्या पाच-सहा वर्षांपासून अनेक अपघातांच्या घटना घडलेल्या आहेत. या अपघातांमध्ये वाढ होऊ लागली आहे. गोव्याहून येणारी वाहने सुसाट जातात. तसेच खडी मशीनसाठी ये-जा करणारे टिप्पर व डंपरसुद्धा तुफान वेगाने जातात. त्याचा स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या वाहनधारकांनी वेगावर नियंत्रण आणावे. तसेच किणयेजवळ रस्ता खराब झालेला आहे. त्या रस्त्याचीसुद्धा दुरुस्ती करण्यात यावी.
– सुरेश डुकरे
टिप्पर-डंपर चालकांकडे पोलिसांनी लक्ष द्यावे
गेल्यावर्षी आमच्या घराण्यातील एका महिलेला टिप्परने जोराची धडक दिली होती. या अपघातात ती महिला जखमी झाली. त्या महिलेला धडक देऊन तो टिप्परचालक त्या ठिकाणी थांबलीसुद्धा नाही. भरधाव आला त्या पद्धतीने तो तिथून पसारही झाला. या टिप्पर व डंपरचालकांनी ज्या ठिकाणी गावे आहेत. त्याठिकाणी वाहने सावकाश चालवावीत, अशी आमची मागणी आहे. हे वाहनधारक सुसाट वाहने चालवत आहेत. यावर पोलीस प्रशासनानेही लक्ष देणे गरजेचे आहे.
– यशवंत गुरव