अविश्वास ठरावात कोणत्याही बडय़ा नेत्याचा हस्तक्षेप नाही. अंतर्गत राजकारणात पंचसदस्यांनीच आणला आहे अविश्वास ठराव. पंचसदस्य संदीप सालेलकर यांचा खुलासा.
डिचोली/प्रतिनिधी
पिळगाव पंचायतीच्या सरपंचाविरोधात दाखल केलेल्या अविश्वास ठरावात केवळ पंचायत मंडळातील अंतर्गत राजकारण असून त्यात मये मतदारसंघातील कोणत्याही बडय़ा नेत्याचा हात नाही. पंचायत मंडळ स्थापन करतेवेळी झालेल्या अलिखित कराराचा भंग झाल्यानेच सरपंचांविरोधात या पंचायतीच्या इतर पंचसदस्यांनीच अविश्वास ठराव आणला आहे. त्यात कोणतेही पक्षीय राजकारण आणू नये. असा खुलासा या पंचायतीचे पंचसदस्य संदीप सालेलकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना केला. तसेच त्यांनी आपली वेळ आल्यावर सरपंचपद का स्विकारले नाही याबाबतही स्पष्टीकरण केले.
2017 साली पंचायत निवडणुकीनंतर मंडळ स्थापन करताना प्रदीप नाईक, निलेश जल्मी, ललना गिमोणकर, उर्मिला गावकर व आपण असा आमचा पाच जणांचा गट संघटीत होता. या गटातर्फे सरपंचपद प्रथम दिड वर्ष प्रदीप नाईक यांना, नंतर दिड वर्ष आपणास (संदीप सालेलकर) व नंतरची दोन वर्षे निलेश जल्मी यांना असा सामंजस्य करार करण्यात आला होता. हा सामंजस्य करार माजी सरपंच प्रदीप नाईक यांच्याकडे लिखित स्वरूपातही आहे. या करारानुसार पंचायत कारभार चालत असतानाच प्रदीप नाईक यांचा दिड वर्षांचा कार्यकाळ संपला आणि तेव्हाच या चार सदस्यां?नी पंचायत मंडळच गोवा फॉरवर्ड पक्षात नेले. प्रदीप नाईक, निलेश जल्मी, ललना गिमोणकर व उर्मिला गावकर यां?नी गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश केला. मात्र आपण भाजप म्हणूनच राहिलो.
प्रदीप नाईक यांचा दिड वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर आपण या चारही जणांशी बैठक घेऊन सामंजस्य करारात ठरल्याप्रमाणे आपणास सरपंच पद देण्याची विनंती केली असता त्यांना आपणास गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश करून सरपंचपद घेण्याची अट घातली. ती आपण अमान्य केली. त्यामुळे प्रदीप नाईक यांनीच आपलाही उर्वरीत कार्यकाळ घेतला. तीन वर्षे संपून अधिक दोन महिने झाले तरीही प्रदीप नाईक यांनी सरपंचपद निलेश जल्मी यांच्यासाठी रिक्त केले नव्हते. मात्र त्यासाठी त्यांच्यावर दबाव येऊ लागल्यानंतर त्यांनी राजिनामा देत जल्मी यांना सरपंचपद दिले. असे सालेलकर यांनी सांगितले.
त्यानंतर सरपंच जल्मी यांच्यासह हे सर्व पाचही पंचसदस्य पुन्हा भाजप पक्षात आले. त्यावेळी पंचायत पुन्हा भाजपचीच झाल्याने आपण आपल्या सरपंचपदाचा कार्यकाळ या मंडळाकडे बैठक घेऊन मागितला असता सरपंच निलेश जल्मी यांनी त्यास नकार दिला. पंचायत मंडळ स्थापन करतेवेळी झालेल्या सामंजस्य कराराची आठवणही आपण करून दिली, मात्र हे पंचसदस्य ऐकले नाहीत. परंतु एकटय़ा उपसरपंचा उर्मिला गावकर यांनी सदर सामंजस्य कराराचा मान ठेवत आपणास पाठिंबा दिला. आणि त्यानंतरच सरपंच निलेश जल्मी यांच्याविरोधात अविश्वास ठराव बजावण्यात आला. हे संपूर्ण राजकारण पंचसदस्यांमधील अंतर्गत राजकीय खेळी आणि सामंजस्य कराराचा भंग केल्यामुळे पंचसदस्यां?नीच घडवून आणलेले राजकारण आहे. त्यात पक्षातील कोणत्याही बडय़ा नेत्याचा हात नाही. असा खुलासा करीत आपण सरपंचपद का स्विकारले नाही याचेही स्पष्टीकरण पंचसदस्य संदीप सालेलकर यांनी केले.