काळम्मा बेलेवाडीतील दुर्दैवी घटना
प्रतिनिधी/सेनापती कापशी
काळम्मा बेलेवाडी ता. कागल येथे पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करुन चावा घेतलेल्या बालकाचा खासगी दवाखान्यात मंगळवारी रात्री मृत्यू झाला. रितेश अशोक नाईक ( वय ६ ) असे या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. आपल्या चिमुरड्याचा असा मृत्यू झाल्याने माता- पित्याचा आक्रोश ह्रदय पिवटळून टाकणारा होता. मंगळवारी रात्री उशीरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत मिळालेली माहिती अशी, ४ जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मंदिराजवळ चौकातच रितेश इतर मुलांसोबत खेळत होता. दरम्यान या पिसाळलेल्या कुत्र्याने तिथे येवून रितेशवर हल्ला चढवला. डोक्याचे व तोंडावरील गालाचे लचके तोडून मुलाला रक्तबंबाळ केले होते. अशा अवस्थेत त्याला गडहिंग्लजमध्ये सुरवातीला उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात नंतर खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले होते. उपचारानंतर त्याला घरी आणले होते.
मात्र मंगळवारी सकाळी त्याच्या पोटात दुखू लागल्याने गडहिंग्लजमध्ये खासगी दवाखान्यात पुन्हा दाखल केले होते. मात्र रात्री उशीरा दवाखान्यातच उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई- वडील, एक मोठी बहीण, आजा- आजी असा परिवार आहे. पिसाळलेल्या कुत्र्याने हिंसकपणे हल्ला केल्याने रक्तस्त्राव, जखमा झाल्या होत्या. त्यामुळे त्याच्या बालमनाने प्रचंड धास्ती घेतली होती. शिवाय रेबीजचा परिणाम होवून त्यातच त्याचा मृत्यू झाला.
त्यादिवशी त्याच पिसाळलेल्या कुत्र्याने रितेशसह येथील सचिन मारुती पाटील (वय ४२), कासारीतील शिवाजी लिंगाप्पा नाईक (वय ५६), आलाबादमधील राहूल महादेव भोपळे ( वय २० ) यांच्यावर करुन चावा घेतला होता. तर गौसलाल देसाई यांच्या म्हैशीचे व संजय कदम यांच्या बैलाचेही या कुत्र्याने लचके तोडून जखमी केले.