नियम न पाळल्यास मालकांचे योगदान कठीण होणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी (ईपीएफ) च्या खातेदारांसाठी आता केंद्र सरकार नवे नियम करणार आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत या सर्व खातेदारांना त्यांची ईपीएफ खाती आधार कार्डाशी जोडावी लागणार आहेत. मालकाकडून निधीच्या खात्यात होणारे योगदान आणि इतर लाभ मिळविण्यासाठी हे आवश्यक आहे. ठराविक काळात आधार कार्ड खात्याशी न जोडल्यास मालकांना या निधीत योगदान करणे कठीण होणार आहे. सर्व कर्मचाऱयांनी याची दखल घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू होणार आहेत.
नवे नियम लागू करण्यासाठी सामाजिक सुरक्षा संहिता 2020 (सोशल सिक्युरिटी कोड 2020) मध्ये सुधारणा कार्मचारी मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. त्यानुसार कर्मचारी किंवा असंघटीत क्षेत्रातील कर्मचारी यांच्यासाठी आपली ओळख प्रस्थापित करणे आवश्यक आणि अनिवार्य ठरणार आहे. ही ओळख आधार क्रमांकाच्या माध्यमातून प्रस्थापित करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ईपीएफ संस्थेने तशा प्रकारची अधिसूचना (नोटीफिकेशन) प्रसिद्ध केले आहे.
कालावधीत वाढ
नवे नियम प्रथम 1 जून 2021 पासून लागू होणार होते. मात्र कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या कालावधीत वाढ करण्यात आली असून आता आधार क्रमांक ईपीएफ खात्याशी जोडण्याचा कालावधी 31 ऑगस्ट 2021 पर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यानंतर मात्र आणखी वाढ दिली जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे ज्यांनी अद्याप त्यांची ईपीएफ खाती आधारशी जोडलेली नाहीत, त्यांनी ही प्रक्रिया येत्या दोन महिन्यांमध्ये पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा कर्मचाऱयाची अडचण होऊ शकते, असे स्पष्ट करण्यात आले आहे.