- भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची टीका
ऑनलाईन टीम / पुणे :
‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’वर (पीएमआरडीए) सदस्यांच्या नियुक्त्या करताना भाजपच्या लोकप्रतिनिधींना जाणीवपूर्व डावलले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्षीय राजकारण करीत असल्याची टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे.
मुळीक म्हणाले, ‘नवनियुक्त सदस्यांमध्ये पुण्याचे खासदार गिरीश बापट, पुणे शहर, पिंपरी-चिंचवडचे महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, आणि भाजपच्या एकाही आमदाराचा समावेश केलेला नाही. उलट पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्राशी दूरान्वये संबंध नसणार शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि आमदार तानाजी सावंत यांचा विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हा पुणे शहर आणि जिल्ह्यातील मतदारांचा अपमान आहे.’
मुळीक पुढे म्हणाले, ‘पुणे परिसर हे देशातील सर्वात वेगाने विकसित होत असलेले आर्थिक क्षेत्र म्हणून उदयाला येत आहे. या क्षेत्राच्या नियोजनबद्ध विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करावे ही मागणी १९९७ पासून करण्यात येत होती. परंतु सत्तेत असलेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्राधिकरणाचे अध्यक्ष पद आणि सूत्रे आपल्याच हाती राहावी यासाठी संघर्ष होता. त्यामुळे प्राधिकरणाची स्थापना होऊ शकली नाही. २०१४ मध्ये राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक लक्ष घातले. वर्षभरात पीएमआरडीएची स्थापना करण्यात आली. पीएमआरडीएचा विकास आराखडा मंजूर करून त्याद्वारे मोठ्या प्रमाणात विकासाची कामे सुरू झाली आहेत. रिंग रोड, शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो प्रकल्प असे मोठे प्रकल्प सुरू आहेत. पीएमआरडीएवर राजकीय वर्चस्व ठेवण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्र्यांनी पक्षपातीपणे निर्णय घेतला आहे. त्यामुळे विकासकामांना खिळ बसण्याची भिती निर्माण झाली आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने या निर्णयाचा निषेध करण्यात येत आहे.’