केंद्र सरकारकडून शेतकऱयांना मोठी भेट शक्य – 6 ऐवजी 12 हजार रुपये मिळण्याची शक्यता
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
केंद्र सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत मिळणाऱया आर्थिक मदतीला दुप्पट करण्याचा विचार करत आहे. लाभार्थी शेतकऱयांना 2 हजार रुपयांच्या ऐवजी 4 हजार रुपयांचा हप्ता मिळू शकतो. जर हा निर्णय झाल्यास शेतकऱयांना दरवर्षी 6 हजारांच्या जागी 12 हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये मिळू शकतील. केंद्र सरकार लवकरच लाभार्थी शेतकऱयांना ही भेट देऊ शकते.
बिहारचे कृषीमंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान पीएम किसान योजनेच्या अंतर्गत मिळणारी रक्कम दुप्पट करण्यावरही चर्चा करण्यात आली. पण यासंबंधी अद्याप कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही.
सध्या दरवर्षी 6 हजार रुपये
पीएम किसान योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार प्रत्येक शेतकरी कुटुंबाला दरवर्षी 6 हजार रुपये देते. ही रक्कम 2 हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये देण्यात येते. प्रत्येक 4 महिन्यांनंतर हा सन्मान निधी थेट शेतकऱयांच्या बँक खात्यात जमा केला जातो.