प्रतिनिधी / कोल्हापूर
पंतप्रधान किसान योजनेतून ज्येष्ठ शेतकऱयांना 6 हजार रूपये मानधनाची योजना केंद्र सरकारने सुरू केली. जिल्हय़ातील या योजनेतील 68 हजार 229 लाभार्थी त्यांच्या आधारकार्डमधील चुकांमुळे वंचित राहण्याच्या धोका निर्माण झाला आहे. जिल्हा प्रशासनालाही निधी देताना अडचणी येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून साठ वर्षांवरील शेतकऱयांना वर्षांतून 6 हजार रूपये तीन टप्प्यात मानधन देण्याची योजना केंद्र सरकारने जाहीर केली. त्याची अंमलबजावणी सुरू झाली. दोनवेळा यामधील निकष बदलले, योजनेच्या ऍपमध्येही बदल झाले. जिल्हय़ात योजनेतील सहभागी पात्र लाभार्थ्याच्या नावावर पहिल्या टप्प्यात ही रक्कम जमा झाली आहे; पण आधारकार्डमधील चुकांमुळे अद्याप 68 हजार 229 लाभार्थी योजनेपासून वंचित राहिले आहेत. तालुकानिहाय शेतकऱयांची आकडेवारी पुढीलप्रमाणेः कागल 12 हजार, करवीर 11 हजार 900, शिरोळ 9 हजार 300, हातकणंगले 7 हजार 300 आणि चंदगड 5 हजार 586. वंचित लाभार्थ्यांनी आधारकार्डमधील चुका दुरूस्त करून न घेतल्यास ते या योजनेपासून वंचित राहण्याचा धोका आहे.
तलाठी, मंडल अधिकाऱयांकडून आधार दुरूस्त करून घ्या ः जिल्हाधिकारी
पी.एम. किसान योजनेतील 68 हजार 229 लाभार्थ्यांच्या नावात, पत्त्यात चुका राहिल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यापर्यत योजनेचा लाभ पोहोचवणे प्रशासनासाठी अडचणीचे ठरले आहे. तरी वंचित लाभार्थींनी गावातील तलाठी, मंडल अधिकारी, ग्रामसेवकांकडे यासंदर्भात संपर्क साधून आपले आधारकार्ड दुरूस्त करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.