वार्ताहर /काकती
पीएम किसान निधी योजनेसाठी ई केवायसीची अपडेट करावयाची अंतिम तारीख 22 मेपर्यंत वाढविली आहे. यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पीएम किसान योजनेच्या 11 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कोटय़वधी शेतकऱयांना ही आनंदाची बातमी आहे. बेळगाव जिल्हय़ात अद्यापही अनेक कारणास्तव ई केवायसी अपडेट करण्याचे राहून गेले होते. केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसीची मुदत वाढवली आहे. पीएम किसान पोर्टलच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या अधिसूचनेनुसार शेतकरी 22 मेपर्यंत अपडेट(ekyc) करू शकतात. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱयांना ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. या योजनेतील सातबारावर हयात असलेल्या शेतकऱयालाच लाभ मिळावा, या उद्देशाने ही योजना दरवर्षी अपडेट करावयाची आहे. एखाद्या शेतकऱयाने अपडेट केले नसेल तर या योजनेचा निधी मिळणार नाही, अशी तरतूद करण्यात आली आहे.
पीएम किसानसाठी ई-केवायसी घरबसल्या स्मार्ट मोबाईलवरून करता येते. यासाठी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन मुख्य पृष्ठावर, उजव्या बाजूच्या ई-केवायसी पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. येथे आपला आधारकार्ड नं. आणि कॅप्चा (Capcha) टाकावा लागणार आहे. सर्च ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. नंतर आधारकार्डशी लिंक केलेला मोबाईल नं. टाकावा लागेल. त्यानंतर ओटीपी (OTP) टाकताच तुमचा आधार तपशील अपडेट होईल. वरील दिलेल्या माहितीचे अनुसरण करून तुम्ही पीएम किसान यादीमध्ये तुमचे नाव सहजपणे तपासता येईल.