नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
टोक्यो ऑलिम्पिकमधील सहभागी झालेल्या सर्व भारतीय खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला.) यावेळी पंतप्रधान मोदींनी सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा, कुस्तीपटू रवी कुमार दहिया व बजरंग पुनिया, बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, पुरुष हॉकी संघातील खेळाडू यांच्यासह सर्व खेळाडूंशी चर्चा केली. विजेत्यांनी विजय डोक्यात जाऊ देऊ नये आणि पराजितांनी हार मानू नये असा सल्लाही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
यावेळी पंतप्रधानांनी सर्व खेळाडूंची विचारपूस करत त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. त्याचबरोबर त्यांचे ऑलिम्पिक खेळादरम्यानचे अनुभवही जाणून घेतले. काही जणांसोबत त्यांनी थट्टामस्करीसुद्धा केली व काहीं खेळाडूंनी त्यांच्यासोबत सेल्फी देखील काढली. तसंच पंतप्रधान मोदी यांनी सर्वा ऑलिम्पिकवीरांना मार्गदर्शनही केलं.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधताना सर्व खेळाडूंना सांगितलं की, खेळाडूंच्या आयुष्यात हारजित येतंच असते. त्यामुळे विजय डोक्यात जाऊ देऊ नये आणि अपयश, हार कधीच मनात राहू देऊ नये. हा मंत्र आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे. विजय जर डोक्यात राहिला तरी त्याचा काही उपयोग नाही आणि हार मनात राहिली तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिक विजेत्यांसोबतच सर्वच खेळाडूंशी तसंच प्रशिक्षकांशीही संवाद साधला.
देशाच्या हॉकी संघाशी संवाद साधताना हॉकी खेळाडूंनी नरेंद्र मोदींचे आभार मानले. खेळ संपल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या फोनमुळे खेळाडूंचं मनोबल वाढलं असंही या संघाच्या खेळाडूंनी सांगितलं. तुम्ही सर्वांनी मेजर ध्यानचंद यांना खरी श्रद्धांजली वाहिली आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी या खेळाडूंना म्हणाले.