नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 77 व्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित केले. भारतावर कोरोनाचे भयानक संकट आलेलं असताना देशातील जनतेनी धैर्य दाखवलं, गेल्या शंभर वर्षातील सर्वात मोठ्या महामारी विरोधात संपूर्ण देश पूर्ण ताकतीने लढतोय असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. यानंतर आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर सोशल मीडियाच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटले आहे, कोरोनाशी लढण्यासाठी पाहिजे – योग्य हेतू, धोरण, निश्चय आणि महिन्यातून एकदा निरर्थक बोलणं नाही, अशा शब्दांमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.
राहुल गांधी देशातील कोरोना स्थितीवरून वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदी सरकारवर टीका करत असतात. राहुल गांधींनी दोन दिवसांपूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या पत्रकारपरिषदेत लसीकरणाबाबत योग्य नियोजन केलं गेलं नाही तर कोरोना महामारीच्या अनेक लाटा येतच राहातील, असा इशारा केंद्र सरकारला दिला होता. तसेच, पंतप्रधानांच्या खोट्या प्रतिमेसाठी कोणत्याही विभागाचा मंत्री कोणत्याही विषयावर काहीपण बोलण्यासाठी मजबूर आहे. देशाला सोबत घेऊन चला, विषाणूचा प्रादुर्भाव थांबवा, खोटं बोलणं बंद करा, लसीकरण मोठ्याप्रमाणात करा, अशा शब्दात राहुल गांधी यांनी ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.