नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
विरोधकांच्या गोंधळानंतर आज लोकसभा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी तसेच तृणमूल काँग्रेस, अकाली दल, वायएसआरसीपी, बिजू जनता दल यासह अनेक विरोधी पक्षांचे नेतेही सभापती ओम बिर्ला यांना भेटण्यासाठी आले होते.
यावेळी ओम बिर्ला म्हणाले की, काही खासदार ज्या पद्धतीने वागले ते योग्य नव्हते. संसदेचा सन्मान राखला गेला पाहिजे. सर्व पक्षांनी यावर विचार करायला हवा, कारण जर जनता निवडून पाठवते, तर जनतेचे प्रश्न इथे उपस्थित केले पाहिजेत.
राज्यसभेत घडलेल्या घटनेवर ओम बिर्ला म्हणतात की मला दुसऱ्या सभागृहाबद्दल भाष्य करायचे नाही, पण मला एवढे सांगायचे आहे की, जर सभा व्यवस्थित चालली नाही तर कोणताही अध्यक्ष नक्कीच नाराज होईल.