प्रतिनिधी / शाहुवाडी
समोरून येत असलेल्या मोटारसायकल वरील युवकाला पीकअप गाडीने चिरडून झालेल्या अपघातात वारूळ येथील दिलीप दगडू जंगम (वय 23) हा जागीच ठार झाला. तर उमेश मधुकर जंगम-कासार्डे (वय 24) गंभीर जखमी आहे.
कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर हा अपघात झाला. उमेश व दिलीप मोटारसायकलने कासार्डे हून मलकापूरला निघाले होते. कोल्हापूरहून रत्नागिरीकडे निघालेल्या पिकअप गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने वालूर गावाजवळील अवघड वळणावर समोरून आलेल्या मोटारसायकलला पिकअपने उजवीकडे बाजूपट्टीपर्यंत चेपत नेले. दिलीपच्या डोक्यावरून चाक गेल्याने मोठा रक्तस्त्राव होवून तो जागीच ठार झाला. मलकापूर ग्रामीण रूग्णालयात त्याचे शवविच्छेदन करून दूपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. जखमी उमेश कोल्हापूर येथे उपचार घेत आहे. अपघातानंतर पिकअप चालक पसार झाला आहे. दिलीप हा लव्हाळा येथे मोटार मॅकेनिकलचे काम करीत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ आहे. मनमिळाऊ दिलीपच्या अपघाती मृत्यूमुळे वारूळ पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होत आहे.