दोडामार्ग – वार्ताहर:
भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनामार्फत प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माहिती रथाचे आज दोडामार्ग मध्ये स्वागत करण्यात आले. येथील तहसीलदार कार्यालयात तहसीलदार अरुण खानोलकर व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी तहसीलदार अरुण खानोलकर, नायब तहसीलदार एन. एन. देसाई, विमा प्रतिनिधी संतोष चव्हाण, कृषी पर्यवेक्षक सद्गुरू एस. ए. , तालुका कृषी अधिकारी स्नेहा शेटे, यांसह सुरेश चव्हाण, कृषी सहाय्यक ए. एस. कोळी, संतोष महागडे, जी. आर. लोखंडे, नंदू चौधरी आदी उपस्थित होते.तहसीलदार अरुण खानोलकर यांनी सांगितले की, या प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादनात आलेली घट व अन्य जोखीमामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई या विमा पॉलिसीच्या माध्यमातून अदा करण्यात येणार असून या विमा योजनेसाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी येत्या 15 जुलै पर्यंत विमा उतरून घ्यावा असे आवाहन श्री. खानोलकर यांनी केले.