दर कमी होणार की स्थिर राहणार ? याचे संकेत लवकरच स्पष्ट होईल
प्रतिनिधी / कोल्हापूर
वर्षभरात फौंड्री उद्योगातील कच्च्या मालाचा दर गगनाला भिडला असल्याने, फौंड्री उद्योगाची स्थिती चालू-बंद अशी झाली आहे. विशेषतः पीग आयर्नचा दर दामदुप्पट झाल्याने, फौड्री उद्योगावर कोरोनानंतर याच्या दरवाढीचा फटका बसला आहे. सध्या फौड्री तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पीग आयर्न कंपन्यांनी याची दखल घेतल्याने, गेल्या चार दिवसात पीग आयर्न दरवाढीला ‘ब्रेक’ लागला आहे. पीग आयर्नचा दर कमी होणार की स्थिर राहणार हे लवकरच स्पष्ट होण्याचे संकेत आहेत.
कोल्हापुरात लहान-मोठय़ा अशा 450 फौंड्रीज् आहेत. या फौंड्रीवर सुमारे बाराशे लघु व मध्यम उद्योग अवलंबून असून, यामध्ये लाख ते सव्वा लाख कामगार काम करत आहेत. फौंड्री उद्योगासाठी लागणारे पिग आयर्न, कास्ट आयर्न स्क्रॅप, माइल्ड स्टील या कच्च्या मालामध्ये अंदाजे 30 ते 35 टक्क्याने वाढ झाली आहे. दरवाढ होऊन देखील रोख पैसे भरून देखील हा कच्चामाल उपलब्ध होत नाही. कोल्हापूरच्या फौंड्रीना महिन्याला सुमारे 25 हजार टन पिग आयर्नची गरज असून, यातून 75 हजार टन कास्टिंग तयार केले जात आहे.
या एक मार्चपासून पीग आयर्नच्या दराचा आलेख वरवर जात आहे. या दरवाढीची दखल गोव्याच्या पीग आयर्न कंपनीने घेतली असून, या अधिकाऱयांनी नुकतीच कोल्हापूरला भेट देऊन, छोटया-मोठया फौंड्री उद्योजकाशी चर्चा केली. सध्या तरी पीग आयर्नचा दर स्थिर राहीला आहे. एक मार्च त नऊ मार्चअखेर पीगचा टनाला 11750 रूपयांनी वाढ होऊन,62750 रूपये इतकी झाली होती.पण अधिकाऱयांच्या कोल्हापूर भेटीनंतर आजअखेर पीगचा दर स्थिर राहीला आहे.
यापूर्वी फौड्री उद्योजकांना पीग आयर्नसाठी 30 दिवसाचे क्रेडिट देऊन दोन दिवसात पीगची डिलिव्हरी होत होती. पण सद्यस्थितीत ऍडव्हॉन्स पैसे किंवा बँक गॅरंटी दिल्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर पीगची डिलिव्हरी केली जात आहे. ज्या दिवशी दर असेल त्या वाढीव दरानेच हे पीग घ्यावे लागत आहे.
पीग आयर्न कंपनीनी घेतली ‘तरूण भारत’ च्या वृताची दखल
अवघ्या एक वर्षात फौंड्री उद्योगातील कच्च्या मालाच्या दरात 30 ते 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेषतः पीग आयर्नचा वाढता दर व त्य़ावरील 18 टक्के जीएसटीचा फटका उद्योजकांना बसत आहे. यामुळे आठवडयातून तीन दिवस उद्योग बंद असे वृत नुकतेच ‘तरूण भारत’ ने दिले होते. या वृतामुळे पीग आयर्न कंपनीच्या अधिकाऱयांनी थेट कोल्हापूरला भेट देऊन स्थानिक उद्योजकांशी चर्चा करून 10 तारखेनंतर हा दर स्थिर ठेवण्यात आला आहे.