तीस टक्के कपात, सत्तर टक्के अभ्यासक्रमावरच होणार परीक्षा
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाच्या संकटकाळात यंदा पीयुसी द्वितीय वर्षाच्या परीक्षेसाठी भाषा विषयांच्या अभ्यासक्रमात कपात करण्यात आली आहे. 70 टक्के अभ्यासक्रमावरच प्रश्नपत्रिका तयार करण्यात येणार आहे. 30 टक्के अभ्यासक्रमाला कात्री लावण्यात आली असून तसा आदेश पदवीपूर्व शिक्षण खात्याने बजावला आहे. कोविडमुळे यंदाही शाळांना उशिरा सुरुवात झाली. त्यानंतर अलीकडे रुग्ण पुन्हा वाढत असल्याने काही ठिकाणी शाळा-महाविद्यालयांना सुटय़ा देण्यात आल्या होत्या. त्याचा विचार करून पदवीपूर्व शिक्षण खात्याने भाषा विषयांच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.
केंद्र शिक्षण सचिवालय आणि सीबीएसई बोर्डाने बारावीच्या अभ्यासक्रमात कोणत्याही प्रकारची कपात केली नसल्याने राज्य परीक्षा मंडळाने ऐच्छिक विषयात कोणत्याही प्रकारची कपात केलेली नाही. केवळ भाषा विषयांबाबत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. त्यामुळे भाषा विषयांची परीक्षा देणाऱया कर्नाटकातील विद्यार्थ्यांना 30 टक्के कमी अभ्यास करून परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
फेब्रुवारी 17 पासून प्रायोगिक परीक्षा
राज्यात बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा दि. 17 फेब्रुवारीपासून 25 मार्चपर्यंत चालणार आहेत. त्याशिवाय दि. 14 ते 25 मार्चपर्यंत पूर्वतयारी परीक्षा घेण्यात येणार आहेत. अकरावीच्या परीक्षा दि. 28 मार्च ते 13 एप्रिलपर्यंत चालणार आहेत. या दोन्ही परीक्षा त्या-त्या शैक्षणिक जिल्हय़ाच्या उपसंचालकांच्या नेतृत्वाखाली प्रश्नपत्रिका तयार करून घ्यायच्या आहेत.
बहुपर्यायी प्रश्नांवर भर
राज्यातील पदवीपूर्व शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना सोयीचे होण्यासाठी यावेळी जास्तीत जास्त बहुपर्यायी प्रश्न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची फारशी भीती राहणार नाही, असा शिक्षण खात्याचा होरा आहे. भाषा विषयात अभ्यासक्रम कमी करून दिलेल्या खात्याने ऐच्छिक विषयांत बहुपर्यायी प्रश्न देऊन विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. यापूर्वी एक गुणाच्या प्रश्नाला पर्यायी उत्तरे दिली जात नव्हती. यावेळी ही पद्धत देण्यात येणार आहे. दोन, पाच, दहा गुणांच्या प्रश्नांसाठी जादा संख्येने ऐच्छिक प्रश्न उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
कर्नाटकात शिक्षण खाते अलर्ट
राज्यातील शिक्षण खाते नेहमी अलर्ट राहिले आहे. गतवषी कोरोनाच्या महामारीतही पूर्वतयारी करून दहावी व बारावीच्या परीक्षा घेतल्या होत्या. यावेळीही कोविडकाळात शैक्षणिक वर्ष सुरू करून इतर राज्यांना एक रोडमॅप दिला आहे. आता राज्यात कोविडची आकडेवारी वाढत असली तरी मुलांना संसर्गाचे प्रमाण कमी असल्याने शाळा व महाविद्यालये सुरूच ठेवली आहेत.
बारावी परीक्षेबाबत 1 फेब्रुवारीपर्यंत आक्षेप नोंदविण्यासाठी मुदत
राज्यात 16 एप्रिल ते 4 मे या कालावधीत बारावीच्या परीक्षा घेण्यासाठी पदवीपूर्व शिक्षण खात्याने नियोजन केले आहे. तात्कालिक वेळापत्रक जारी केले असून 1 फेब्रुवारीपर्यंत आक्षेप नोंदविण्यासाठी मुदत दिली आहे. त्यानंतर खात्याकडून त्यावर विचार करून अंतिम वेळापत्रक जारी केले जाणार आहे.