ऑनलाईन टीम / मुंबई :
आज सकाळ पासूनच पावसाने कोकण, मुंबईमध्ये जोरदार हजेरी लावली. मुंबईसह उपनगरात तर दुपारी पावसाने जोर धरला होता. त्यानंतर आज आणि उद्या मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पालघरला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड यासारख्या कोकण किनारपट्टी भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबईत आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरु होती. मात्र दुपारनंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुंबईत लोअर परळ, वरळी, दादर, माटुंगा, किंग्ज सर्कल या भागात जोरदार पाऊस पाहायला मिळाला, तर उपनगरात अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरिवली या ठिकाणीही मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या राज्यात पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. यानुसार 15 ते 17 जुलैपर्यंत कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे