प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात नेतृत्वबदलाच्या चर्चेला ऊत आलेला असतानाच भाजप वरिष्ठ नेते बी. एस. येडियुराप्पा यांनी पुढील दोन वर्षे मीच मुख्यमंत्री असल्याचे विधान केले आहे. हायकमांडने आपल्यावर विश्वास दाखवून राज्यात नेतृत्वबदल करणार नाही. आपणच पूर्ण कालावधीचा मुख्यमंत्री असल्याचे ठामपणे सांगितले आहे. त्यामुळे आपल्यावरील जबाबदारी वाढली आहे, असेही येडियुराप्पा म्हणाले.
हासन जिल्हय़ात तेथील कोरोना परिस्थितीसंदर्भात आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. पुढील दोन वर्षे देखील आपणच मुख्यमंत्रिपदावर असणार आहे. राज्याच्या विकासासाठी आपण आणखी परिश्रम करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आणखी उंचावण्याचा प्रयत्न करेन. राज्य भाजप प्रभारी अरुणसिंग यांनी येडियुराप्पा चांगल्या प्रकारे कार्य करीत आहेत. त्यामुळे तेच मुख्यमंत्रिपदावर असतील, असे सांगितले होते. त्यांच्या या स्पष्टीकरणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांचा आपल्यावरील विश्वास कायम असल्याचे सिद्ध होते, असेही येडियुराप्पा म्हणाले.