उद्या होणार गोव्यात दाखल, : 26 रोजी मडगावात प्रात्यक्षिके,जुनी यंत्रे पाठविली बिहारला
जय उत्तम नाईक /पणजी
राज्य विधानसभेत नवीन वर्षात नवे लोकप्रतिनिधी पाठविण्यासाठी होणाऱया निवडणुकीत गोमंतकीयांना अत्याधुनिक नवी कोरी मतदान यंत्रे मिळणार आहेत. एम 3 प्रकारातील ही ईव्हीएम यंत्रे आणि सोबत व्हीव्हीपॅटही मिळणार आहेत. राज्यातील आतापर्यंत वापरात असलेली जुनी एम-2 ईव्हीएम यंत्रे यापूर्वीच बिहार राज्यात पाठविण्यात आली आहेत. तेथे होणाऱया निम्नस्तरीय निवडणुकांमध्ये त्यांचा वापर करण्यात येणार आहे.
बीईएल कंपनीतर्फे निर्मित ही नवी कोरी यंत्रे दि. 1 ऑक्टोबर रोजी गोव्यात दाखल होणार असून सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयात ती उतरवून घेण्यात येणार आहेत. त्यासंबंधी सीईओ कार्यालयातर्फे सर्व पक्षांना पत्रे पाठविण्यात आली आहेत.
मडगावात 26 रोजी चाचणी
राज्यातील चाळीसही मतदारसंघांसाठी सुमारे 3500 यंत्रांची गरज आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात 2300 ईव्हीएम आणि 2500 व्हीव्हीपॅट यंत्रे दाखल होणार आहेत. या यंत्रांचा प्रत्यक्ष मतदानासाठी वापर करण्यापूर्वी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत प्रथम टप्प्यातील चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानुसार येत्या दि. 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता दक्षिण गोव्यात मडगाव येथे पालिका उद्यानासमोरील जुन्या जिल्हाधिकारी इमारतीत या चाचणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी सर्वांनी स्वतः किंवा अधिकृत प्रतिनिधी मार्फत उपस्थित राहावे, अशी पत्रेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे सर्व पक्षांच्या प्रमुखांना पाठविण्यात आली आहेत.
या चाचणीसाठी बीईएल कंपनीचे अभियंते गोव्यात दाखल हेणार असून राज्यातील राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींना यंत्राची प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया भारतीय निवार्चन आयोगाच्या सूचनेनुसार करण्यात येत आहे.
टी. एन. शेषन यांची संकल्पना
भारताचे तत्कालीन मुख्य निर्वाचन आयुक्त टी. एन. शेषन यांच्या संकल्पनेतून ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र निर्मितीचा विचार पुढे आला. त्यानुसार 1989 मध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि ईलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय निर्वाचन आयोगाने ईव्हीएम विकसित करण्यात यश मिळविले. या कामात आयआयटी मुंबईचेही महत्वाचे योगदान लाभले होते.
ईव्हीएमचा सर्वप्रथम वापर गोव्यातच झाला
सुरुवातीलस राजस्थान, मध्य प्रदेश आणि दिल्लीतील काही निवडक मतदारसंघात या यंत्रांचा प्रायोगिक तत्वावर वापर करण्यात आला. या यंत्रांचा खऱया अर्थाने सर्वप्रथम वापर करण्याचा बहुमान गोव्याला प्राप्त झाला. 1999 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण चाळीसही मतदारसंघात या यंत्रांद्वारे यशस्वीरित्या मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली. तेव्हापासून झालेल्या सर्व निवडणुका, पोटनिवडणुकांमध्ये याच यंत्रांद्वारे घेण्यात आल्या. 2004 च्या लोकसभा निवडणुकीतही ईव्हीएमचा वापर करण्यात आला होता.