वृत्तसंस्था/ बेंगळूर
इस्रो पुढील 8 महिन्यांमध्ये पहिल्यांदाच एखाद्या खासगी भारतीय कंपनीचा उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करणार आहे. बेंगळूरमध्ये अंतराळ तंत्रज्ञानाशी संबंधित स्टार्टअप पिक्सेल-इंडियाचा अर्थ ऑब्झर्वेशन उपग्रह ‘आनंद’ इस्रोच्या पीएसएलव्ही सी-51 प्रक्षेपकाद्वारे अंतराळात पोहोचेल.
‘आनंद’च्या माध्यमातून पृथ्वीवर होणाऱया कुठल्याही घटनेची पूर्णवेळ प्रत्यक्ष स्थितीतील छायाचित्रे उपलब्ध होऊ शकतील. पिक्सेलच्या उपग्रहाच्या मदतीने शेतीतील पिक आणि मातीमध्ये होत असलेल्या बदलांवरही नजर ठेवता येणार आहे. यासंबंधी एखादे पाऊल उचलण्यात येणार असल्यास याची माहितीही प्रत्यक्षवेळेत पोहोचविता येणार आहे. परंतु ही माहिती पिक्सेल थेट शेतकऱयांना पुरविणार नाही, तर अन्य कंपनी किंवा संस्था पिक्सेलकडून डाटा प्राप्त करून शेतकऱयांना एसएमएसद्वारे देणार आहे.
दर 24 तासांनी डाटा मिळणार
याचप्रकारे वनक्षेत्रात होत असलेले बदल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना रस्ते तसेच पायाभूत सुविधांमध्ये होत असलेल्या बदलांची प्रत्यक्षवेळेत माहिती मिळणार आहे. अर्थ ऑब्झर्वेशन उपग्रहाद्वारे आताही नजर ठेवली जात असली तरीही पिक्सेलचा डाटा दर 24 तासांनी उपलब्ध होणार आहे. या उपग्रहांद्वारे समस्या लवकर ओळखून त्यावर तत्काळ तोडगा काढता येणार आहे. पूरसारख्या आपत्तींमध्ये व्यवस्थापन, जल तसेच हवाप्रदूषणावरही नजर ठेवता येणार असल्याचे उद्गार पिक्सेलचे संस्थापक क्षितिज खंडेवाल यांनी काढले आहेत.
2023 पर्यंत एकूण 24 उपग्रहांचे प्रक्षेपण
पिक्सेल इंडिया एक अर्थ इमेजिंग स्टार्टअप असून त्याद्वारे 2023 पर्यंत एकूण 24 उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. सर्व उपग्रह इस्रोच्या अर्थ ऑब्झर्वेशन उपग्रहाच्या आकार आणि खर्चाच्या तुलनेत 10 पट लहान असतील. सर्व 24 उपग्रह अंतराळात स्थिरावल्यावर याची क्षमता 24 तासांमध्ये जागतिक व्याप्तीची असणार आहे.