हळदोणेत आपला विजय नक्की : किरण कांदोळकर यांचा दावा
प्रज्ञा मणेरीकर /पणजी
गोव्यात ममता बॅनर्जी यांचा तृणमूल पक्षच भाजपला ताकदीची टक्कर देऊ शकतो आणि ममता बॅनर्जी भाजपला गोव्यात सत्ता स्थापित करू देणार नाही. पुढील सरकार तृणमूल काँग्रेस पक्षाचे सरकार येणार. 75 टक्के मतदार हे मला मतदान करणार आणि माझा विजय नक्कीच होणार दावा किरण कांदोळकर यांनी यावेळी केला.
किरण कांदोळकर यांनी यापूर्वी थिवी मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर निवडून आले आहेत. त्यानंतर त्यांनी 2020 मध्ये गोवा फॉरवर्ड पक्षामध्ये सामील झाले होते आणि त्यांना यंदाच्या हळदोणा मतदारसंघातून गोवा फॉरवर्ड पक्षातून उमेदवारी घोषित करण्यात आली होती. परंतु गोवा फॉरवर्ड पक्षाने काँग्रेससोबत युती केल्यामुळे कांदोळकर यांनी गोवा फॉरवर्ड पक्ष सोडून तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. गोवा फॉरवर्डचे किरण कांदोळकर हळदोण्यातून निवडणूक लढविणार असे स्पष्ट केल्यावर एक नवचैतन्य निर्माण झाले होते. मात्र कालांतराने त्यांनी तृणमूलशी आपले नाते जोडल्याने काही कार्येकर्ते नाराज झाले होते. परंतु आता चित्र बदलत आहे. आता किरण कांदोळकर हळदोणा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढविणार आहेत. त्यानिमित्त दै. तरूण भारतच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधला.
नागरिकांना हवाय बदल
प्रत्येक घरोघरी जाऊन मतदान करण्याचे आवाहन करत आहोत. हळदोणा मतदारसंघात मागील दहा वर्षांपासून हळदोणाचे आमदार ग्लेन टिकलो यांनी काहीच काम केलेले नाही. लोक त्यांच्यावर नाराज असून हळदोणाच्या नागरिकांना आता बदल हवाय आणि हा बदल घडविण्यासाठी एक पर्याय म्हणून हळदोणाचे नागरिक माझ्याकडे आशेने पाहत आहेत, असे किरण कांदोळकर यांनी सांगितले.
गोव्यामध्ये भाजपामध्ये काम केले असल्याने विजयाचा आणि पराभवाचा अनुभव तसा आहे. परंतु आता गोमंतकीय हे भाजप आणि काँग्रेसला कंटाळले असून त्यांच्यासमोर तृणमूल काँग्रेस व मगो पक्ष हा एकच नवीन पर्याय दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात किंवा भाजपविरोधात कुणी ताकदीने टक्कर देऊ शकतो याचा पर्याय पाहत आहे. ममता बॅनर्जी यांच्याकडे दुसरा पर्याय म्हणून पाहत आहे. भाजप तृणमूल काँग्रेस पक्षाचा अपप्रचार करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये एका महिलेकडून पराभव पत्करावा लागल्याने ही गोष्ट त्यांना सहन होत नसून आरोप केले जात आहे, असे ते म्हणाले.
हळदोणा मतदारसंघ विकासाशिवाय
हळदोणा मतदारसंघात मागील दहा वर्षे विकास काहीच केला नाही. विकास म्हणजे काय हे आमदार ग्लेन टिकलो यांना माहिती नाही. मागील तीन वर्षे रस्त्याबद्दल काहीच दुरूस्ती करण्यात आली नाही. निवडणुका जाहीर झाल्यानंतर रस्ता दुरूस्ती करण्यात आला. मार्केट कॉम्प्लेक्स, वीज, पाणी हे मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. परंतु मी निवडून आलो तर मयडे ते थिवी छोटासा पूल बांधण्यात येणार असून रेल्वेस्थानकावर जाण्यास सोपे होईल. रोजगार आणू, या गोष्टीत आमदारांनी लक्ष घालणे आवश्यक होते. हळदोणा मतदारसंघात उच्चशिक्षित युवक व युवती आहेत. त्यांना हळदोण्याच्या आमदारांनी नोकरीसाठी प्रयत्न करणे आवश्यक होते. सध्या या भागात बेरोजगारीच्या समस्येला सामोरे जात आहेत. आतापर्यंत सरकारी नोकरी ही सरपंच, पंचच्या मुलाला, बायकोला दिली आहे. सामान्य नागरिक अजूनपर्यंत सरकारी नोकरीपासून वंचित आहेत. कोरोना महामारीनंतर गोव्यात जास्त प्रमाणात बेरोजगारीची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे भाजप सत्ता स्थापित करू शकणार नाही, असा दावा कांदोळकर यांनी केला आहे.
कायदेशीररित्या खाणव्यवसाय सुरू करणार
दोन लाख नोकऱया उपलब्ध करून त्यात 10 हजार सरकारी नोकऱया देण्यात येतील. गोव्यात समुद्रकिनाऱयापर्यंत इको टूरिझम मर्यादित न ठेवता ग्रामीण भागात आणणार. खोर्जुवे गावातील खाणअवलंबितांना भरपूर आश्वासने मिळाली परंतु ती पूर्ण झाली नाहीत. तृणमूल सरकार आले तर कायदेशीररित्या खाणींचा लिलाव करून खाणव्यवसाय सुरू करणार. केंद्र सरकारने भाजप सरकारला 16 हजार कोटी रूपये दिले होते ती विकासकामे गोव्यात दिसून येत नाहीत. हे सर्व पैसे पाण्यात घातले आहे. कोरोना महामारीत ऑक्सिजन कमतरतेमुळे युवक मृत्युमुखी पडले आहे असा आरोप किरण कांदोळकर यांनी यावेळी केल आहे.
तृणमूल व मगो पक्ष गोव्यात नवी सकाळ आणणार
गोमंतकीयांना भाजप किंवा काँग्रेस नकोय तर हवाय बदल. तृणमूल पक्षाने गोमंतकीयांसाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. याशिवाय गोव्यातील भाटकारशाही संपवून गोमंतकीयांना घराचा मालकी हक्क देण्यात येणार आहे. गोव्यात 50 हजार लोक मालकी हक्काशिवाय राहतात. त्यांना 100 चौ.मी जागा देऊन घर बांधून देणार आहे. तृणमूल पक्षाकडे आतापर्यंत साडेसहा लाख कुटुंबे जोडली गेलेली आहेत. तृणमूल काँग्रेस आणि मगो पक्ष गोव्यात नवी सकाळ आणणार असा दावा किरण कांदोळकर यांनी यावेळी केला.
तृणमूल व मगो पक्षाला मतदान करा
गोव्यामध्ये मोठय़ा प्रमाणात बहुजन समाजाचे लोक असून भाटकारशाही संपवून तृणमूल काँग्रेस पक्ष व मगो पक्षाला संधी द्या. पाच वर्षात नवीन सकाळ नक्कीच उजाडणार आहे. त्यामुळे तृणमूल व मगो पक्षाला मतदान करा असे आवाहन किरण कांदोळकर यांनी यावेळी केले.