कोणे एके काळी पुण्याच्या अमृततुल्य हॉटेलात काही पाटय़ा हमखास असत. उदाहरणार्थ ‘कामाशिवाय जास्त वेळ बसू नये’, ‘दोघात एक चहा मिळणार नाही’, ‘येथे राजकारणावर आणि क्रिकेटवर चर्चा करू नये’, वगैरे. सांप्रत या पाटय़ांना तसा अर्थ उरलेला नाही. कारण कोरोनामुळे हॉटेलात बसून चहा घेता येत नाही. हॉटेलवाले कागदी कपात चहा देतात. तो घेऊन रस्त्याच्या कडेला उभे राहून प्यावा लागतो. चहा पिताना नाकाओठांवरचा मास्क काढावा लागतो. अशा वेळी कोरोनाचा जंतू जवळ आला तर तो (‘तुपात पडली माशी’च्या चालीवर) चहात पडत असेल. काही पुणेकर कोरोनावर मात करण्यासाठी वेगळी ऐडिया करतात. ते मास्क नाकातोंडावर न बांधता हनुवटीवर बांधतात. त्यामुळे कोरोना येऊन मास्कवर धडकला की त्यांच्या दाढीत जाऊन अडकतो आणि गुदमरून मरतो.
एका मंगल प्रभाती दूध आणायला जाताना दूध डेअरीजवळच्या अमृततुल्य समोर चार सद्गृहस्थ हनुवटीवर मास्क आणि हातात चहाचे कप घेऊन गहन चर्चा करीत होते. दुधाच्या रांगेत असताना मी ऐकलेली काही मुक्ताफळे-
“अनधिकृत बांधकाम पाडलं ते मस्त झालं.’’
“असं कसं? मुंबईत लाखो अनधिकृत बांधकामे असतील. तिचंच का पाडलं? हा अन्याय आहे.’’
“मग मला सांग, देशात लाखो शेतकरी आत्महत्या करतात. गोरगरीबांचे भूकबळी होतात. त्यांच्याऐवजी याच नटाच्या मृत्यूची चौकशी का चालू आहे?’’
“ते मला नाही ठाऊक.’’ “समजा तुला वाहतुकीचे नियम मोडताना पोलिसाने पकडलं आणि तू म्हणालास की लाखो लोक नियम मोडतात, मला पकडू नका… तर पोलीस ऐकेल का?’’
“मी काय म्हणतो, एरव्ही आपण पोलीस चौकीवर तक्रार करायला गेलो की पोलीस विचारतात, गुन्हा आमच्या हद्दीत झालाय का? तशी वाहतूक पोलिसांना हद्द नसते काय?’’
“त्यांना हद्द नसते आणि त्यांच्या कर्तव्यकठोरतेला देखील हद्द नसते. एरव्ही गंभीर गुन्हा करून फाशीच्या शिक्षेला पात्र झालेल्या गुन्हेगारांना देखील काही वेळा माफी मिळते. वाहतूक पोलिसांनी कधी कोणाला माफ केलेलं ऐकलंत काय? नाही नं? ताबडतोब हातातले चहाचे रिकामे कप खाली टाका आणि मास्क लावा. समोरून चार वाहतूक पोलीस येत आहेत.’’ त्याबरोबर सर्वांनी हातातले चहाचे रिकामे कप शेजारच्या कचऱयाच्या टोपलीत टाकले आणि हनुवटीवरचे मास्क नाकातोंडावर ओढले.