विशाल कदम / सातारा :
सातारा जिह्यातून जात असलेल्या 125 किलोमीटरच्या पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. एका किलोमीटरच्या अंतरात फुटाफुटाचे किमान पाचशे खड्डे सापडतील. या खड्डय़ामुळे अनेक वाहनांचे पाटे तुटले, अनेक वाहनांचे टायर पम्चर झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पाच दिवसांपूर्वी सातारा पोलिसांनीच खिंडवाडीनजिकचा खड्डा भरला होता. त्यानंतर रस्ते प्राधिकरणाने खड्डे बुजवण्यासाठी पेव्हरची शक्कल लढवली आहे. परंतु बसवलेले पेव्हर काही दिवसात उखडत असून पुन्हा अपघाताला निमंत्रण देत आहेत.
अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे अगोदर चौपदरीकरण करण्यात आले. त्यानंतर सहापदरीकरणाचे काम झाले. हे काम होताना कसेबसे काम करण्याचा ठेकेदाराकडून सातत्याने प्रयत्न झाला. अनेकदा त्यावर सातारा जिह्यातून आवाज उठला गेला. हजारो जणांचे दरवर्षी जीव गेले. अनेक जायबंदी झाले. सातारा जिह्यात महामार्गावरील खड्डे बुजवण्यात यावेत यासाठी स्थानिक नागरिकांनी व टोल विरोधी कृती समितीकडून वारंवार आंदोलने झाली. संकल्प इंजिनिअरींगचे चिन्मय कुलकर्णी यांनी तर मोठा लढा उभारला होता. परंतु महामार्गावरील खड्डे काही बुजले नाहीत. लॉकडाऊनच्या काळात महामार्गावरील वाहतूक कमी होती. तरीही ज्या बाजूने डांबर रस्ता आहे. त्या बाजूने खड्डेच खड्डे पडलेले दिसत आहेत. दरम्यान, त्या तर रस्ते प्राधिकरणाने उन्हाळय़ात खड्डे बुजवण्यासाठी सातारा शहरानजिक हॉटेल महेंद्रपासून ते शेंद्रेपर्यंत डांबराचे पाणी मारले. हे पाणी मारल्याने दुचाकी चालकांना दुचाकी चालवणे जीवावर बेतण्याचा प्रकार घडू लागला. सध्या महामार्गावरुन पडलेले खड्डे पेव्हर ब्लॉकने बसवण्याचे सध्या काम सुरु आहे. त्यामुळे आणखी अपघात वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
महामार्गावरुन जाताना एक दृष्टीस पडते. खड्डे बुजवण्यापेक्षा प्राधिकरणाने दुभाजकामधील आलेले हिरवे गवत जाळण्याची मोठय़ा प्रमाणात केमीकल गेल्या आठ दिवसांमध्ये मारले आहे. त्यामुळे भर पावसात सुद्धा दुभाजकातील गवताबरोबर फुलझाडेही जळून गेली आहेत. त्याचबरोबर सेवा रस्तेही खराब झाले आहेत. हे गवत जाळण्यासाठी किती खर्च आला त्याच खर्चात साईडपटया दुरुस्ती केल्या असत्या तरीही चालले असते अशी मागणी होत आहे.
स्थानिक लोकप्रतिनिदीचे याकडे दुर्लक्ष
सातारा पुणे महामार्ग यावर्षी त्याच परिस्थितीत आहे. ज्या परिस्थितीत होता तसाच. मागच्या वर्षी खूप मोठया प्रमाणात आंदोलन केल. पाठपुरावा केला. लोकप्रतिनिधींना भेटलो. सातारा पुणे हायवे एक तर व्यवस्थित करुन द्या, यासाठी खटाटोप केला. परंतु हायवे तसाच आहे. तात्पुरती डागडुजी केली होती. आजच्या घडीला पाहिले तर हायवेची परिस्थिती जैसे थे झालेली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाहीत. नाहक टोल घेतला जातो. टोल घेवूनही रस्ता तसाच आहे.