प्रतिनिधी/पुलाची शिरोली
पुणे-बेंगळुरु हा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी अद्याप बंदच आहे. रविवारी (ता.२५ जुलै) सायंकाळी ६.३० वाजता महामार्गावर पसरलेल्या महापुराच्या पाण्यात जेसीबी घालून चाचणी घेण्यात आली. महामार्गावर अजून साडे तीन फूट पाणी आहे. शिवाय पाण्याचा दाब आणि वेग जास्त असल्यामुळे वाहतूक सुरू होवू शकत नाही असे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले. गेले तीन दिवस राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद आहे. महामार्गावर ठिकठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
उद्या, सोमवारी (ता.२६ जुलै) सकाळी पुन्हा एकदा जेसीबी घालून पाण्याच्या प्रवाहाचा वेग तपासला जाईल, त्यानंतर वाहतूक चालू करायची की बंद ठेवायची यासंबंधी निर्णय होणार आहे. सांगली फाटानजीक महामार्गावर पाणी पसरले आहे. महापुराच्या पाणी पातळीत संथगतीने घट होत आहे. शनिवारपेक्षा रविवारी पाणी पातळी अतिशय संथगतीने कमी होत होती.पोलिस प्रशासनाने, रविवारी दोन वेळा जेसीबी महापुराच्या पाण्यात घातली. दुपारी, जेसीबी फक्त २५ ते ३० मीटर महापुराच्या पाण्यात घातली. पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे जेसीबी मागे घेतला.
सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा चाचणी घेतली. ५५ ते साठ मीटर जेसीबी पुराच्या पाण्यात घातली. अजूनही महामार्गावर दोन ते तीन फूट पाणी आहे. यामुळे वाहतूक सुरू होवू शकत नाही असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.
पावसाने उसंत दिली, पाण्याचा वेग आणि पाणी पातळीत घट तपासून पुढील निर्णय घेतला जाईल. जर पाणी पातळीत घट झाली तर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना यामध्ये गॅस, पेट्रोल,डिझेल, दूध , ऑक्सिजन व पाणी वाहतूक करणाऱ्या वाहनांना सोडले जाईल.