ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे शहरी व ग्रामीण भागात प्रामुख्याने घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांच्या वीजपुरवठ्यासाठी अत्यंत महत्वाचे असलेल्या अकृषक रोहित्रांमध्ये बिघाड होऊ नये यासाठीच्या पूर्व उपाययोजनांसाठी पुणे प्रादेशिक विभागात ‘बिघाडशून्य अकृषक रोहित्र अभियान’ सुरु करण्यात आले आहे.
पुणे प्रादेशिक विभागाकडून हे अभियान राबविण्यात येत असून महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी याबाबतचे परिपत्रक नुकतेच जारी केले आहे. त्याप्रमाणे साधारणतः दोन महिन्यात पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व अकृषक रोहित्रांची पाहणी करून आवश्यक देखभाल व दुरुस्तीसह विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
या अभियानानुसार सर्व अकृषक रोहित्रांची देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत. महावितरणचे अभियंता, कर्मचारी तसेच कंत्राटदारांकडून ही कामे करण्यात येत आहे. अकृषक रोहित्रांच्या पाहणीमध्ये अनधिकृत वीजभार आढळून आल्यास तो काढून टाकण्यात येत आहे. तसेच ज्या रोहित्रांना क्षमतावाढीची गरज आहे अशा रोहित्रांची क्षमतावाढ करण्यात येत आहे.
त्याप्रमाणे वाढीव क्षमतेचे नवीन रोहित्र उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या अभियानामध्ये साधारणतः येत्या दोन महिन्यांमध्ये सर्व अकृषक वितरण रोहित्रांची देखभाल व दुरुस्ती तसेच क्षमतावाढीचे कामे पूर्ण करण्यात येतील. त्यानंतर अकृषक रोहित्र बंद पडल्यास किंवा त्यामध्ये तांत्रिक बिघाड आढळून आल्यास त्याची संबंधीत विभागीय कार्यालयांचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता मार्फत तपासणी होणार आहे. या तपासणीमध्ये अभियानामध्ये नमूद केलेल्या बाबींच्या उपाययोजनांअभावी रोहित्र नादुरुस्त झाल्याचे आढळून आल्यास महावितरणमधील संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे.