ऑनलाईन टीम / पुणे :
कोविड-19 विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्याच्या दृष्टीने हाती घेण्यात आलेली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था व नागरिक या सर्वांच्या सहभागाने प्रभावीपणे राबवूया, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राज्यभर राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या पूर्वतयारीबाबतचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला.
जिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले, या मोहिमेत सर्व नागरिकांचा व लोकप्रतिनिधींचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत व नगरपालिका क्षेत्रात टप्प्याटप्प्याने ही तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून यात सर्व नागरिकांची तपासणी करण्यात येणार असून संशयितांची कोविड-19 चाचणी करण्यात येणार आहे. या तपासणीचे उद्दिष्ट कोविड-19 बाबत प्रत्येक नागरिकांना शिक्षित करणे तसेच संशयित नागरिकांना तात्काळ शोधणे व त्यावर लवकरात लवकर उपचार सुरू करणे हे आहे, जेणेकरून जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करता येईल.
कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार मिळवून देण्याबरोबरच आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार’ट्रीटमेंट प्रोटोकॉल’ चे पालन करुन जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी आरोग्य विभागाला केल्या.