पाच डझनाचा भाव तब्बल 21 हजार 500 रुपये
पुणे / प्रतिनिधी :
पुण्यातील मार्केट यार्डात रत्नागिरी हापूसची आवक सुरू झाली असून रविवारी पहिली पेटी दाखल झाली. या पाच डझनाच्या पेटीला तब्बल 21 हजार 500 रुपयांचा विक्रमी भाव मिळाला. यंदा वातावरणातील बदलामुळे रत्नागिरी हापूस आंब्याची आवक गेल्या वषीच्या तुलनेत जवळपास दोन महिने उशिराने झाली आहे.
फळ विभागातील अनिरूद्ध ऊर्फ बाप्पू भोसले यांच्या मे. नामदेव रामचंद्र भोसले आणि सन्स या फर्मवर ही पहिली आवक झाली आहे. रत्नागिरी तालुका आणि जिल्हय़ातील टेंभे गावातील शेतकरी सुभाष मनोहर खाडे यांच्या बागेतून ही आवक झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांच्या हस्ते या पेटीचे पूजन करण्यात आले. त्यावेळी अनिरूध्द भोसले, अनिकेत भोसले, संजय वखारे, यशवंत कोंडे, ऋषिकेश भोसले आदी उपस्थित होते.
रावसाहेब कुंजीर या आडत्याने लिलावात ही पेटी खरेदी केली. यावेळी बोलताना बी.जे.देशमुख म्हणाले, शेतकऱयांच्या आंब्याला चांगला भाव मिळाला पाहिजे. त्याचबरोबर ग्राहकाला कमी किमतीत दर्जेदार माल मिळणे अपेक्षित आहे. मार्केट यार्डातील बाजार दिवसेंदिवस वाढत गेला पाहिजे.