ऑनलाईन टीम / पुणे :
लॉक डाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 1 हजार 70 क्विंटल अन्नधान्याची तर 9 हजार 698 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 1 हजार 562 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक 1 हजार 915 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
ते म्हणाले, पुणे विभागात आज 98.761 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 23.030 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
त्याचबरोबर, लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 147 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 1 हजार 112 कॅम्प असे पुणे विभागात एकुण 1 हजार 259 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 4 लाख 27 हजार 518 स्थलांतरित मजूर असून 20 लाख 50 मजुरांना भोजन देण्यात आले असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.