ऑनलाईन टीम / मुंबई :
सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा झाला आहे. विभागात अंदाजे 942 क्विंटल अन्नधान्याची तर 11 हजार 298 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 1 हजार 578 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाट्याची आवक 5 हजार 234 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे विभागात शनिवारी 100.96 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून, 24.97 लाख लीटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे.
दरम्यान, लॉकडाऊन काळात स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 35 कॅम्प, कामगार विभागामार्फत 9 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 5 कॅम्प असे पुणे विभागात एकुण 49 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 1 हजार 452 स्थलांतरित मजूर असून, 13 हजार 478 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, असेही म्हैसेकर यांनी सांगितले.