दक्षता हॉस्पिटल येथे उद्या डॉ. नरेंद्र वैद्य यांची भेट घेता येणार
प्रतिनिधी /बेळगाव
लॉकडाऊनमध्ये घरातूनच काम सुरू असल्याने शारीरिक हालचाल मंदावल्याचे दिसून येते. सांधेदुखीच्या तक्रारी जाणवत आहेत. या समस्येवर वेळीच उपचार होणे गरजेचे आहे. या अनुषंगाने सांधेदुखीवर वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी लोकमान्य रुग्णालयातील जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. नरेंद्र वैद्य यांनी बेळगाव येथील रुग्णांसाठी सांधेदुखीची समस्या सोडविण्यासाठी स्पेशालिटी ओपीडी सुरू केली आहे. दि. 15 जुलै रोजी दक्षता हॉस्पिटल येथे सायंकाळी 4 ते 6 यावेळेत त्यांची भेट होणार आहे.
सांधेदुखी हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो. आपल्या शरीरात खांदे, कोपर, खुबा आणि गुडघे येथे हाडांचे सांधे असतात. याठिकाणी सूज येणे, कडकपणा व तीव्र वेदना अशी लक्षणे आढळतात. गुडघ्याच्या सांध्यामध्ये चालणे, उठणे व बसणे अशक्य होते. पायऱया चढताना त्रास होणे, मांडी घालून बसता न येणे, सांध्यातून कटकट असा आवाज येणे, सांधे जखडणे आणि शौचास बसताना त्रास होणे ही सांधेदुखीची लक्षणे आहेत.
असंतुलित आहार, बैठे काम, व्यायामाचा अभाव, वर्क फ्रॉम होम यामुळे वजन वाढते व वाढत्या अतिरिक्त वजनामुळे गुडघ्याच्या हाडांची झीज होते. यामुळे गुडघेदुखी होते. अलीकडे लोक सूर्य प्रकाशातून मिळणाऱया व्हिटॅमिन डी पासून वंचित राहतात. यामुळे हाडे ठिसूळ होऊ लागतात. अशा स्थितीत सांध्याच्या दुखण्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. कारण वेळीच उपचार न झाल्यास सांध्यातील वेदना वाढू शकते. लोकमान्य रुग्णालयातील जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. नरेंद्र वैद्य यांनी सांगितले की, सांध्यामध्ये वेदना होत असल्यास तसेच हालचालीत बंधने येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच तपासणी करून घेणे गरजेचे असते. वेळीच उपचार न झाल्यास संधीवाताचा त्रास अधिक वाढू शकतो. वाढत्या वयानुसार ऑस्टिओपोरोसिस आणि ऑस्टिओआर्थरायटीससारखा आजारही होण्याची शक्यता असते. म्हणूनच शारीरिक हालचाल करताना अडचण जाणवत असेल किंवा सांध्यात वेदना होत असतील तर हा त्रास कशामुळे होतोय, हे जाणून घेण्यासाठी लवकर निदान करणे आवश्यक आहे.
रोबोटीकच्या साहाय्याने शस्त्रक्रिया
लॉकडाऊनमुळे सांध्याच्या रुग्णांवर उपचार करता येत नसल्याने रुग्णांची प्रतिक्षायादी वाढली आहे. काही रुग्णांमध्ये गुडघ्यांची झीज अधिक प्रमाणात असते. अशा रुग्णामध्ये सांधेरोपण शस्त्रक्रिया करणे हा एकमेव पर्याय आहे. आजकाल या शस्त्रक्रिया रोबोटीकच्या साहाय्याने केल्या जातात. भारतात हे तंत्रज्ञान आणून यशस्वी करणारे डॉ. नरेंद्र वैद्य हे पहिले सर्जन असून सर्वाधिक रोबोटीक सांधेरोपण शस्त्रक्रियाही त्यांनी केल्या आहेत.