गायन, वादन व नृत्याची पर्वणी
पुणे / प्रतिनिधी :
कलाश्री संगीत मंडळाच्या वतीने दरवषी आयोजित करण्यात येणारा ‘कलाश्री संगीत महोत्सव’ यंदा (उद्यापासून) शुक्रवार ते रविवार 26 जानेवारी दरम्यान होणार आहे. गायन, वादन व नृत्य अशा संपूर्ण संगीताची अनुभूती देणारा हा कार्यक्रम दुपारी साडेचार ते रात्री 10 वाजेपर्यंत जुन्या सांगवीमधील गजानन महाराज मंदिरासमोर असलेल्या अहिल्यादेवी शाळेच्या मैदानावर होणार आहे.
कलाश्री संगीत मंडळाचे संस्थापक पं. सुधाकर चव्हाण यांनी या महोत्सवाची सुरुवात केली असून, भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या हस्ते या महोत्सवाची सुरुवात झाली होती. महोत्सवाचे हे 23 वे वर्ष आहे. तरुण कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाची सुरुवात झाली. त्याचप्रमाणे ज्येष्ठ कलाकारांनाही ऐकण्याची संधी या महोत्सवात मिळते.
संगीत क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱया प्रतिथयश कलाकारांचा सन्मान करण्यासाठी मंडळाच्यावतीने ‘कलाश्री पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. यंदा हा पुरस्कार शास्त्रीय गायक श्रीनिवास जोशी यांना रविवार दि. 26 रोजी प्रदान करण्यात येणार आहे. रोख रुपये 11 हजार, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असेल. तसेच युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी शकुंतला नारायण ढेरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘कलाश्री युवा पुरस्कार’ तबला वादक ईशान घोष यांना प्रदान करण्यात येणार आहे. रोख रुपये 5 हजार, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी पिंपरी चिंचवडच्या महापौर माई मनोहर ढोरे, आमदार लक्षमण जगताप व सांगवीच्या अरविंद एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आरती राव यावेळी उपस्थित राहणार आहेत.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी (दि. 24) सुरंजन व शुभम खंडाळकर यांच्या शास्त्रीय गायनाने सुरुवात होणार असून, त्यानंतर पं. सुधाकर चव्हाण यांचे शिष्य शिवानंद स्वामी यांचे शास्त्रीय गायन होईल. या दिवसाची सांगता ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना गुरु शमा भाटे यांच्या शिष्या अमीरा पाटणकर, अवनी गदे, भार्गवी सरदेसाई यांच्या कथक नृत्याविष्काराने होईल. सारेगमप लिटील चॅम्पस व झी युवा संगीत साम्राटच्या विजेत्या ठरलेल्या नंदिनी व अंजली गायकवाड यांच्या गायनाने दुसऱया दिवसाची (दि. 25) सुरुवात होणार आहे. यावेळी पं. हरिप्रसाद चौरासिया यांचे शिष्य हिमांशू नंदा यांचे बासरी वादन, तर इंदोरच्या ज्ये÷ गायिका कल्पना झोकरकर यांचे गायन होणार आहे.
महोत्सवाच्या शेवटच्या दिवसाची (दि. 26) सुरुवात भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचा नातू विराज जोशी याचे शास्त्रीय गायनाने होणार आहे. त्यानंतर मुंबई येथील पं. नयन घोष व ईशान घोष यांच्या तबला जुगलबंदीचा रसिकांना आस्वाद घेता येणार आहे. महोत्सवाचा समारोप ज्येष्ठ गायक पं. कुमार गंधर्व यांचे नातू भुवनेश कोमकली यांच्या शास्त्रीय गायनाने होणार आहे. महोत्सवाचे निवेदन आनंद देशमुख व नामदेव तळपे करणार आहेत.