ऑनलाईन टीम / पुणे :
महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे. मात्र, मृत्यूंचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील लॉकडाऊनचे निर्बंध 15 जूनपर्यंत कायम ठेवण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज पत्रकार परिषद घेत शहरातील नवीन निर्बंधांची माहिती दिली. ते म्हणाले, मागील काळात सर्वांच्या सामुहिक प्रयत्नामुळे करोनाची दुसरी लाट बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आली आहे. त्यामुळे आता जनजीवन सुरळीत होण्याच्या दृष्टीकोनातून महानगरपालिकेने नवे आदेश काढले आहेत. मात्र, अजूनही करोनाचा धोका पूर्णपणे संपलेला नाही आहे, त्यामुळे आता नव्या सूचनांचंही काटोकरपणे पालन करावे असे आवाहन महापौर मोहोळ यांनी केले आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार,पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालये 25 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच सोमवार ते शुकवार या कालावधीत सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सर्व दुकाने सुरू राहणार आहेत. शनिवार रविवार अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील.
यासोबतच मद्यविक्रीची दुकानेही सकाळी 7 ते दुपारी 2 सुरू राहणार आहेत. शहरातील सर्व बँका कामाचे सर्व दिवस सुरू असणार आहे. तसेच कृषी संबंधित सर्व दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे, असेही मोहोळ यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, दुपारी 3 नंतर अत्यावश्यक सेवा वगळता इतर कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई घालण्यात आली आहे. हॉटेल,जिम पुन्हा बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच वाहतुकीदरम्यान होणारा कोरोना संसर्ग टाळण्यासाठी पीएमपी सेवाही बंदच ठेवली जाणार आहे. तर रेस्टॉरंट आणि बारमध्ये फक्त पार्सल/ घरपोच सेवेसाठी सुरू राहतील. दरम्यान, या आदेशांचे पालन न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.