ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पुदुचेरीत काँग्रेसप्रणीत सत्तारूढ आघाडीतील आणखी दोन आमदारांनी रविवारी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस आघाडीचे विधानसभेतील संख्याबळ कमी झाले होते. त्यामुळे आज नारायणसामी सरकारवर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली आणि त्यांना बहुमत सिद्ध करण्यास अपयश आले. सरकार पडल्यानंतर मुख्यमंत्री व्ही नारायणस्वामी यांनी राजीनामा दिला आहे.
दोन आमदारांच्या राजीनाम्यानंतर 33 सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत सत्तारूढ काँग्रेस आघाडीचे संख्याबळ 11 वर आले होते. तर विरोधी आघाडीकडे 14 सदस्य संख्या होती. त्यामुळे नारायणस्वामी सरकारवर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली. बहुमत ठराव सादर करण्यासाठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. अधिवेशन सुरु होताच नारायणसामी यांनी बहुमतासाठी प्रस्ताव मांडला होता. पण काही वेळातच त्यांच्यासह सत्ताधारी आमदारांनी सभात्याग केला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेस सरकार अल्पमतात असल्याचे जाहीर केले.