कर्नाटकातील उदयोन्मुख आणि लोकप्रिय अभिनेता पुनीत कुमारच्या अचानक जाण्याने संपूर्ण कर्नाटकावर शोककळा पसरली. राज्योत्सवावर त्याच्या जाण्याचे सावट दिसले. दुसरीकडे रा. स्व. संघाची बैठक होऊन त्यात 2025 साली शतकोत्सव साजरा करण्याचे ठरले असून यानिमित्ताने शाखेच्या विस्ताराचीही योजना बनवली गेली आहे.
दक्षिणेतील राज्यात कलावंतांना देवाच्या जागी पूजले जाते. याचमुळे कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश या तिन्ही राज्यात चित्रपट अभिनेते सर्वोच्च शिखरावर पोहोचलेले आहेत. कै. डॉ. राजकुमार, तामिळनाडूत रजनीकांत, कमल हासन, एमजीआर, जयललिता, करुणानिधी आदी अनेक नावे घेता येतात. इतकी लोकप्रियता मिळविण्यासाठी या कलाकारांना बराच पल्ला गाठावा लागतो. कष्ट करावे लागतात. लोकांना जे हवे आहे ते त्यांच्या सिनेमातून दाखवून त्यांचा विश्वास संपादन करावा लागतो. याच पठडीत विष्णूवर्धन, अंबरीश आदी अभिनेतेही बसतात. चालू वर्ष सँडलवूडसाठी अनेक धक्के देणारे ठरले आहे. आधी चिरंजीवी सर्जा, नंतर संचारी विजय आता पुनीत राजकुमार या आघाडीच्या अभिनेत्यांचे याच वषी निधन झाले. पुनीत राजकुमारचे अकाली जाणे प्रत्येकाला चटका लावणारे असेच होते.
चित्रपट अभिनेत्यांना आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम करावा लागतो. शरीर अधिक पिळदार बनविण्यासाठी कसरत करावी लागते. कसरत करता करता कोसळलेल्या पुनीत राजकुमार यांना वाचविता आले नाही. काही क्षणात त्यांचा मृत्यू झाला. केवळ कर्नाटकच नव्हे तर दक्षिणेतील राज्यांतील सिनेरसिकांना यामुळे जबर धक्का बसला आहे. आघाडीचे अभिनेते डॉ. राजकुमार यांचे धाकटे चिरंजीव असल्यामुळे जन्मतःच अभिनयाचे धडे त्यांना घरातच मिळाले. राजकुमार यांची लोकप्रियता इतकी होती, की जर तामिळनाडू व आंध्रप्रदेशमधील राजकीय नेत्यांप्रमाणे जर ते सक्रिय राजकारणात उतरले असते तर कदाचित सत्तासूत्रे त्यांच्या हाती असती. मात्र, त्यांनी सत्तेपासून दूर राहणे शेवटपर्यंत पसंत केले. अप्पू या नावाने ओळखल्या जाणाऱया पुनीत राजकुमार यांच्या सामाजिक कार्याचा आवाकाही मोठा होता. ते हयात असताना या कार्याबद्दल कधी चर्चा झाली नाही. त्यांनीही ती होऊ दिली नाही. आता त्यांच्या निधनानंतर ते किती अनाथांचे पालनकर्ते होते, हे सामोरे आले आहे. त्यांच्या अकाली जाण्याने अनेक चाहत्यांचाही मृत्यू झाला आहे. दक्षिणेत एखाद्या अभिनेत्याचा मृत्यू झाला की आत्महत्येचे सत्र सुरू होते.
पुनीत राजकुमार यांचा जन्म 17 मार्च 1975 चा. ऐन उमेदीच्या वयात त्यांना मृत्यू ओढवला. त्यांच्या जन्मानंतर सुरुवातीला लोहित असे त्यांचे नामकरण करण्यात आले होते. लोहित हे सत्यवादी हरिश्चंद्राच्या मुलाचे नाव. मात्र, तो अल्पायुषी. कोणातरी ज्योतिषाने ही गोष्ट राजकुमार कुटुंबियांच्या लक्षात आणून दिल्याने लोहित हे नाव बदलून पुनीत करण्यात आले. जेणेकरून हा मुलगाही अल्पायुषी ठरू नये, असा त्यामागचा उद्देश होता. तरीही वयाच्या 46 व्या वषी लाखो रसिकांना दुःखसागरात लोटून पुनीत काळाच्या पडद्याआड गेला. सलग तीन दिवस पुनीतचे चाहते त्याच्या अंत्यदर्शनासाठी रांगेत उभे होते. पुनीतच्या अकाली जाण्याने हृदयाघात हा विषय ठळक चर्चेत आला आहे. पुनीतचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? रोज व्यायाम करणाऱया तरुणाचे हृदय अचानक कसे बंद पडले? या कुटुंबाला हृदयरोगाची अनुवंशिकता आहे का? आदी प्रश्नांभोवती सध्या चर्चा सुरू आहे. खुद्द पुनीतवर उपचार करणारे डॉक्टरही बुचकळय़ात पडले आहेत की हे कसे घडले?
पुनीत राजकुमार यांच्या निधनामुळे सिंदगी व हानगल विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेले मतदान पूर्णपणे झाकोळले गेले. याच काळात कर्नाटकात आणखी एक महत्त्वाची घडामोड घडली. हुबळी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवसीय बैठक झाली. या बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक ज्ये÷ नेत्यांनी हजेरी लावली होती. दोन मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी संघाविरुद्ध टीकास्त्र सोडले. गेल्या आठवडय़ात त्यांच्या या टीकेवर कर्नाटकातील राजकीय वातावरण तापले होते. भाजप नेत्यांनीही कुमारस्वामी यांनी जशास तसे उत्तर दिले. संघ आणि त्याचे कार्य यावर राजकीय चर्चा रंगलेली असतानाच ही बैठक झाली. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱया हल्ल्यांचा या बैठकीत निषेध करण्यात आला. धर्मांतराबद्दलहीदेखील चर्चा झाली. 2025 ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेचे शतक साजरे करणार आहे. पुढील दोन वर्षात देशभरात आपला विस्तार आणखी वाढविण्यासाठी या बैठकीत रूपरेषा ठरविण्यात आली आहे. देशभरात 54 हजार 382 संघाच्या शाखा आहेत. त्यापैकी 34 हजार शाखा रोज भरतात. 12 हजार 708 शाखा आठवडय़ाला, 7 हजार 900 शाखा महिन्याला भरतात, अशी माहिती आरएसएसचे राष्ट्रीय सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी दिली आहे.
दुसरीकडे महागाईत भर पडते आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढ सुरूच आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिक व गरीबांवर होत आहे. ऐन दिवाळीत महागाई वाढली आहे. इंधन दराबरोबरच खाद्यतेलाचे दरही गगनाला भिडले आहेत. साहजिकच संपूर्ण बाजारपेठेवर या दरवाढीचा परिणाम जाणवतो आहे. महागाई कमी करून सर्वसामान्यांचे जगणे सुसहय़ करण्याची जबाबदारी असणारे राजकीय पक्षांचे नेते जनतेलाच आपल्या गरजा कमी करण्याचा सल्ला देत आहेत. महागाई, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट, आर्थिक अडचणी, वाढती बेरोजगारी आदींमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. आम्ही सत्तेवर आलो तर धान्य फुकट वाटू, साखर फुकट वाटू, अशी घोषणा करणारे नेते महागाई कमी करण्यात मागे पडले आहेत. यंदाची दिवाळी महागाई, इंधन दरवाढ घेऊन आली आहे. सर्वसामान्य कामगारांना जो पगार आहे तो तितकाच आहे. त्यात कोणतीही वाढ झालेली नाही. त्यामुळे त्यांना संसार कसा चालवावा, याची चिंता सतावते आहे.