चीनची भांडखोर व युद्धखोरनीती अलीकडे वारंवार डोके वर काढत आहे. त्यांच्या चिथावणीखोर कारवायांमुळे गेले चार महिने पूर्व लडाख भागात भारत-चीन सीमेवर प्रचंड तणावाची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवरच लष्करप्रमुख मनोज नरवणेही त्या भागात तळ ठोकून आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत असल्याने जगभरातील सर्वच राष्ट्रे जबाबदारीने वागत आहेत. याउलट शेजारील भूभाग बळकावण्याची चीनची प्रवृत्ती कमी होताना दिसत नाही. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने 29-30 ऑगस्टच्या रात्री पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवराच्या परिसरात पुन्हा एकदा अचानकपणे घुसखोरीचा प्रयत्न केला. भारत-चीन दरम्यानची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा बदलण्याचा चिनी सैन्याचा हा डाव होता. पण सतर्क भारतीय लष्कराने त्यांचा डाव उधळून लावत त्यांचीच बोटे त्यांच्या घशात घातली. भारतीय लष्कराने पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱयावरील महत्त्वाच्या टेकडय़ा ताब्यात घेतल्या असून दहा महत्त्वाच्या ठिकाणी पक्की मोर्चेबांधणी केली आहे. जेणेकरुन उंचावरील टेकडय़ांवरून चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीवर बारीक नजर ठेवता येणे शक्य होईल. 29-30 ऑगस्टच्या रात्री घुसखोरीचा प्रयत्न केल्यानंतर चिनी सैनिकांनी 31 ऑगस्टलाही पुन्हा कुरापत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा डाव देखील हाणून पाडला. चोराच्या उलटय़ा बोंबा याप्रमाणे पूर्व लडाखमधील संघर्षाला भारत कारणीभूत असून तणावाच्या परिस्थितीला तेच जबाबदार असल्याचे चीनने म्हटले आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर एप्रिल 2020 ची स्थिती मानण्यास चीन तयार नसल्यामुळे दोन्ही देशांदरम्यानची परिस्थिती चिघळत आहे. तिबेटच्या पठारापासून ते हिंदी महासागरापर्यंतच्या प्रदेशावर चीनचा डोळा आहे. हिमाचल प्रदेश, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाच्या काही भूभागाची चीन सातत्याने मागणी करत आहे. अरुणाचल प्रदेशातील तवांग हा तिबेटचाच भाग असल्याचे चीन मानतो. किंबहुना अरुणाचल प्रदेशाला तो दक्षिण तिबेट म्हणून ओळखतो. या सर्व घडामोडीकडे चीनने बळकावलेल्या समृद्ध तिबेटच्या नजरेतून पहायला हवे. सीमेवर तणाव असताना चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचे वरिष्ठ नेत्यांसमोर नुकतेच भाषण झाले. फुटीरवादाला फाटा देत राष्ट्रीय ऐक्य व तिबेटमध्ये स्थिरता आणण्यासाठी अभेद्य मोर्चेबांधणी करा असा सल्ला त्यांनी दिला. उत्तर पँगाँग ते दक्षिण पँगाँग हा भारतीय भूभाग लाटण्याचा प्रयत्न करण्यामागे तिबेटी पठाराला लष्करी कारवायांच्या दृष्टीने जास्तीत जास्त सखोलता मिळावी हा चीनचा उद्देश आहे. परंतु भारतीय सैनिकांनी डावपेचात्मक हालचाली करुन तो हाणून पाडला. शेजारील राष्ट्रांच्या भूभागात घुसखोरी करायची, त्यांच्या विरोधात जोरजोरात कांगावा करायचा, तिथे आपला हक्क सांगायचा, दबावाने त्यांना माघार घ्यायला भाग पाडायचे अशी व्यूहरचना चीन सातत्याने करत आला आहे. 2017 ला डोकलाम बाबतीतही त्यांनी हेच केले. पूर्व लडाखमध्येही ते हीच नीती वापरत आहेत. आताही चीनने आगळीक केल्यामुळे पँगाँग सरोवराच्या दक्षिण काठावर सैन्याची प्रचंड जमवाजमव करावी लागली. 1962 नंतर लडाखमधील संघर्षाने प्रथमच एवढे गंभीर वळण घेतले आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांचे सैन्य गेले काही महिने आमने सामने उभे असून तोफा, रणगाडे, लढाऊ विमाने आदी लष्करी कुमक तैनात झाली आहे. परिणामी याठिकाणी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गंभीर परिस्थितीबाबत लष्करप्रमुखांनी देखील दुजोरा दिला आहे. या सर्व परिस्थितीला सर्वस्वी चीन जबाबदार आहे. पण चाणाक्षपणे तो आपली बाजू झटकत आहे. चीनला वठणीवर आणण्यासाठी हीच योग्य वेळ असून त्यांना कायमचा धडा शिकवण्याची गरज आहे. कारण कोविडपूर्व जगात आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनचे वेगळे स्थान होते. लबाडी करत आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत त्यांनी दबाव निर्माण केला होता हे खरे. पण सध्याच्या कोविडोत्तर जगात त्याच्या स्थानाला धक्का लागला आहे. कोविड विषाणूला रोखण्यात कोविडचा निर्माता असलेल्या चीनने दाखवलेला हलगर्जीपणा यामुळे त्याची विश्वासार्हता हद्दपार झाली आहे. जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्यास चीनच जबाबदार आहे. यामुळे सध्या चीनविरोधात सगळे जग एकवटले आहे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, जपान, भारत यासारख्या दक्षिण-पूर्व आशियातील देशांना चीनचा कटू अनुभव आल्याने ती चीनविरोधात उभी राहिली आहेत. व्हिएतनाम, मलेशिया यांना चीनच्या शेजारीपणाचा फटका बसला आहे. कोविडमुळे उद्ध्वस्त झालेली जागतिक परिस्थिती पाहून एक नैतिकता म्हणून चीनने बचावात्मक भूमिका घ्यायला हवी होती. परंतु सागरी प्रदेश आणि भूप्रदेश बळकावण्याची त्याची महत्त्वाकांक्षा वाढतच चालली आहे. लडाखमधील त्यांचा हिंसाचार कोणालाच आवडलेला नाही. त्यांची विश्वासघातकी प्रतिमा अधिकच उजळली. याउलट गेल्या काही वर्षात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताने आपले स्थान मजबूत केले आहे. वेगळा ठसा उमटवला आहे. अमेरिकेसारखी प्रगत राष्ट्रे भारताच्या चीनविरोधी भूमिकेला पाठिंबा देत आहेत. गलवान खोऱयातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पबजीसह 118 चिनी ऍप्सवर नुकतीच बंदी घालून भारताने चीनला तडाखेबाज टोला दिला आहे. त्याचे स्वागतच करायला हवे. आतापर्यंत 240 चिनी ऍप्सवर बंदी घातली आहे. पबजी हे दक्षिण कोरियाचे ऍप असले तरी त्याचा सर्व्हर चीनमध्ये आहे. साहजिकच यावर संपूर्ण नियंत्रण चीनचे आहे. पबजी हा अतिशय लोकप्रिय ऑनलाईन मोबाईल गेम असून जगभरात त्याचे 60 कोटी ग्राहक आहेत. यापैकी 15 कोटी एकटय़ा भारतातील आहेत. या ऍप्समधून मोठय़ा प्रमाणात माहिती आणि महसूल चीनकडे जात होता. गलवान खोऱयात कडेकोट लष्करी सिद्धता ठेवून संरक्षण आघाडीवर भारताने चोख उत्तर दिले आहेच. पण तब्बल 240 ऍप्ससह चिनी खेळण्यांवर बंदी घालत आर्थिक पातळीवर चीनला जबर चपराक दिली हे बरे झाले.
Previous Articleदिल्लीत दिवसभरात 2914 नवे कोरोना रुग्ण, 13 मृत्यू
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.